पुणे : हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना धायरीतील रायकर मळा परिसरात घडली. या प्रकरणी एका रिक्षा चालकाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. श्यामली कमलेश सरकार (४०, रा.सूर्य उज्ज्वल हाइट्स, रायकर मळा, धायरी, सिंहगड रोड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी नितीन चंद्रकांत पंडित (५१, रा.निसर्ग हाईटजवळ, धायरी, सिंहगड रस्ता) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस कर्मचारी नितीन तनपुरे यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामली सरकार आणि आरोपी नितीन पंडित हे ओळखीचे होते. ती बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत देहविक्रय करायची. पंडित तिला रिक्षातून दररोज बुधवार पेठेत सोडायचा. दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाले होते. तिने पंडितकडून ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते.
पंडितने तिला पैसे परत मागितले होते. पैसे परत देण्यास ती टाळाटाळ करत असल्याने दोघांमध्ये वाद झाले. बुधवारी (दि. ४) दुपारी चारच्या सुमारास पंडित तिला घेण्यासाठी धायरीतील रायकर मळा परिसरात गेला. सरकारच्या सदनिकेत तो गेला. त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादातून पंडितने तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. त्यानंतर, पंडित हा बुधवारी रात्री नांदेड सिटी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि सरकारचा खून केल्याची कबुली दिली. पंडितला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आणि तपास अधिकारी गुरुदत्त मोरे यांनी दिली.