उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला; शरद पवार, अजित पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली, पोलीस सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 11:12 AM2021-05-26T11:12:48+5:302021-05-26T11:14:27+5:30

काही दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याने उजनीचा पाणी प्रश्न पेटला आहे

Solapur Ujani water Disuputes; Sharad Pawar, Ajit Pawar's house security increased, police alert | उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला; शरद पवार, अजित पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली, पोलीस सतर्क

उजनीच्या पाण्याचा संघर्ष पेटला; शरद पवार, अजित पवारांच्या घराची सुरक्षा वाढवली, पोलीस सतर्क

Next
ठळक मुद्देगेल्या ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न इंदापूर-सोलापूरच्या लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे आणखी चिघळला आहे.पाच टीएमसी पाण्याच्या उपशावरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष सुरू सोलापुरातील काही शेतकरी बारामतीत आंदोलन करण्याच्या तयारीत होते.

बारामती – उजनी धरणाच्या पाण्यावरून सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यात संघर्ष पेटला आहे. आता या आंदोलनाची धग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यापर्यंत पोहचली आहे. पवारांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी आणि अजितदादांच्या सहयोग सोसायटी घराच्या बाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून पोलीस सतर्क झाले आहेत.

उजनीच्या पाणी वाटपावरून(Ujani Water Disputes) सोलापुरातील काही शेतकरी बारामतीत आंदोलन करण्याच्या तयारीत होते. त्याआधीच पोलिसांना ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे पोलिसांनी पवारांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही बाजूंकडून शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याने उजनीचा पाणी प्रश्न पेटला आहे. इंदापूर तालुक्यासाठी ५ टीएमसी पाणी देण्याचा निर्णय मंजूर करण्यात आला त्यावरून हा संघर्ष सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न इंदापूर-सोलापूरच्या लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपामुळे आणखी चिघळला आहे. उजनी धरणक्षेत्र परिसरातील पाच टीएमसी पाण्याच्या उपशावरून पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष सुरू झाला आहे. अवर्षणप्रण क्षेत्रातील आणि रखडलेली म्हणून इंदापूर तालुक्याला मंजूर झालेली योजना पाणी वाटप योजनेत बसत नसल्याचे सांगत सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधाने रद्द झाली आहे. या योजनेचे भवितव्य आता राज्य सरकारच्या हाती आहे. कोणताही निर्णय झाल्यास एक गट नाराज होणार आहे आणि संघर्ष कायम राहील.

माझ्यासाठी इंदापूर आणि सोलापूर दोन्हीही समान आहेत. मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांबरोबर येणाऱ्या काळात सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील.- दत्तात्रय भरणे, आमदार इंदापूर आणि पालकमंत्री सोलापूर जिल्हा

सांडपाण्याचे गणित दाखवून अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने उजनीतून पाणी पळविण्याचा घाट घातला गेला आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ६०० कोटीची तरतूद सुचविली आहे. इंदापूरच्या शेतकऱ्यांना आमचा विरोध नाही. खडकवासला योजनेतून त्यांना पाणी द्या. पण उजनी पाणी वाटपातून थेंब शिल्लक नसताना, हा अट्टाहास कशाला? - प्रशांत परिचारक, आमदार

उजनीचे पाणी वाटप झालेले आहे. आता योजनांसाठी थेंबही पाणी शिल्लक नसताना सांडपाण्याचे गणित दाखवून बारामती, इंदापूरला पाणी पळविण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. - प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला. आंदोलने सुरू झाली. भाजपचे आमदार, खासदारांनी या योजनेला विरोध केलाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने, कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे,तसेच शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, यांनीही विरोध केला.

Web Title: Solapur Ujani water Disuputes; Sharad Pawar, Ajit Pawar's house security increased, police alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.