Pandharpur Election: पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन; भगीरथ भालकेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 10:58 AM2021-05-04T10:58:41+5:302021-05-04T10:59:20+5:30

Pandharpur Election: पराभूत झालो तरी संपलो नाही, अशी प्रतिक्रिया भगीरथ भालके यांनी दिली आहे. 

Pandharpur Election: Though defeated, it is not over, said NCP leader Bhagirath Bhalke | Pandharpur Election: पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन; भगीरथ भालकेंची प्रतिक्रिया

Pandharpur Election: पराभूत झालो तरी संपलो नाही, पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन; भगीरथ भालकेंची प्रतिक्रिया

googlenewsNext

पंढरपूर: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे हे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा ३,७३३ मतांनी पराभव करून  विजयी झाले.  पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिवंगत भारत भालके यांच्या आकस्मिक निधनामुळे पंढरपूर- मंगळवेढ्याची पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादीकडून त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली. भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली होती.

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघ हा अनेक वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. भाजपा-सेनेची युती असल्यापासून या ठिकाणी त्यांचा उमेदवार कधीही निवडून आलेला नाही. पण यावेळी कमळ फुलले आहे. आवताडेंना १ लाख ९ हजार ४५० मते मिळाली, तर  भालके यांना १ लाख ५ हजार ७१७ मते मिळाली. आवताडेंचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे हे २,९५५ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिले, तर शिवसेनेच्या बंडखोर नेत्या शैला गोडसे या १,६०७ मते घेत चौथ्या क्रमांकावर राहिल्या. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष सचिन शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यांनाही अवघ्या १,०२७ मतांवर समाधान मानावे लागले आहे. 

पंढरपूर- मंगळवेढ्याच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्याने पक्षासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीत निवडणुकीअगोदर पदाधिकारी निवडीवरून सुरू असलेला गोंधळ, विठ्ठल कारखान्याची मागील काही वर्षांपासून असलेली बिकट आर्थिक अवस्था, भगीरथ भालके यांचा कमी असलेला जनसंपर्क, मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे कट करण्यात आलेले वीज कनेक्शन, कर्जमाफी, अनुदान, विठ्ठल बळकावण्याचा भाजपकडून केलेला प्रचार यानंतर अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदारांनी प्रचार करूनही ही जागा महाविकास आघाडीला राखण्यात अपयश आले, असं सांगण्यात येत आहे. याचदरम्यान पराभूत झालो तरी संपलो नाही, अशी प्रतिक्रिया भगीरथ भालके यांनी दिली आहे. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना भगीरथ भालके म्हणाले की, निवडणुकीत निसटत्या मताने पराभव झाला असला तरी मी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. जनतेने यावेळी वडिलांपेक्षा जास्त १५ हजार मतांचा आशीर्वाद दिल्याने पुढच्यावेळी पराभवाचे उट्टे काढेन, असा भगीरथ भालके यांनी व्यक्त केला आहे. आपले वडील देखील २००४ साली पहिल्यांदा पराभूत झाले होते, मात्र लगेच दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा जनतेत मिसळून काम केले आणि नंतर ३ वेळा विजयी झाले होते. तीच लढायची शिकवण वडिलांनी दिली आहे, असं भगीरथ भालके यांनी सांगितले.

दरम्यान, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून भाजपाचे समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. सुरूवातीच्या काही कलानंतर आवताडे पिछाडीवर जातील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना होता. परंतु शेवटपर्यंत आवताडे यांनी आघाडी वाढतच गेली. अखेर ३८ व्या फेरीनंतर समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला गेला. समाधान आवताडे हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे ५ वे आमदार म्हणून निवडून आले आहेत.

आवताडे आणि परिचारक यांच्या एकीचा विजय

मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.

Web Title: Pandharpur Election: Though defeated, it is not over, said NCP leader Bhagirath Bhalke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.