"अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 14:30 IST2021-01-02T11:47:08+5:302021-01-02T14:30:55+5:30

Sandeep Deshpande News : आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा.

MNS Ultimatum to Shiv Sena on issue of Aurangabad Name Chang | "अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम

"अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम

ठळक मुद्दे२६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करातसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असे अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आले सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं

मुंबई - औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता मनसेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते. तर आता या मुद्द्यावरून मनसेनेही शिवसेनेची कोंडी केली आहे. अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा, असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरताना संदीप देशपांडे म्हणाले की, आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा. तसेच २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करा, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असे अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आले आहे. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. त्यांना कृती करणे जमत नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला. 


दरम्यान, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने आज मुखपत्र असलेल्या सामनामधून अग्रलेख लिहित विरोधकांवर घणाघाती टीका केली होती. या अग्रलेखात म्हटले आहे की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध जाहीर केल्यानंतर भाजपाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार असा प्रश्न चंद्रकांत पाटील आदी लोकांनी केला आहे. शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी असा भाजपाचा आग्रह आहे. पण त्यात भूमिका स्पष्ट करण्यासारखे काय आहे. शिवसेनेने भूमिका बदललेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले होते. हे नामांतर लोकांनी स्वीकारले आहे. आता सरकारी कागदपत्रांमध्येही लवकच दुरुस्ती होईल. भाजपाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत ते औरंग्यापुढे गुडघे टेकत अशतील तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे हा शिवरायांचाच अपमान ठरतो. एमआयएमचा ओवेसी संभाजीनगरला येऊन औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतो. त्या ओवेसीच्या पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारत आहेत, हे ढोंग आहे. असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.

Web Title: MNS Ultimatum to Shiv Sena on issue of Aurangabad Name Chang