नवाब मलिक, आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते; भाजपचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:26 IST2021-05-22T17:25:20+5:302021-05-22T17:26:33+5:30
राज्यात सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आहेत का?, भाजपचा सवाल

नवाब मलिक, आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते; भाजपचा निशाणा
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्रालाही बसला होता. दरम्यान, सर्वाधिक रुग्णसंख्याही महाराष्ट्रात नोंदवण्यात येत होती. गेल्या काही दिवसांपासून देशातील आणि राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. परंतु दुसरीकडे मृत्यूंच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसत आहे. भाजप महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा एक व्हिडीओ शेअर करत निशाणा कोरोनाच्या परिस्थिवरून निशाणा साधला आहे.
“महाराष्ट्रात देशांतील सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आहेत का? नवाब मलिक प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री महोदय चौकशी करा,” अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली आहे. “नवाब मलिक आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते. चाचण्या वाढविल्यामुळे करोना संख्या वाढून सरकारची बदनामी होत असल्याचा सल्ला देणारे पत्रकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे राज्य सरकार असे एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक कुणाची बदनामी करत आहेत?,” असा सवालही त्यांनी केला. केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली. तसंच आपल्या ट्वीटसह त्यांनी एक व्हि़डीओदेखील शेअर केला आहे.
हा तर आपल्याच सरकारला दिलेला घरचा आहेर आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 22, 2021
नवाब मलिक महाराष्ट्राचे कोरोनाचे आकडे कमी दिसावेत म्हणून टेस्ट कमी केल्याची लोकांची शंका जुनीच आहे. तुमचे हे वक्तव्य त्याची कबुली दिसते. खरे काय ते सांगा. उगाच पत्रकारांच्या मागे लपू नका. सरकार पत्रकार चालवतात का ?..३
“हा तर आपल्याच सरकारला दिलेला घरचा आहेर आहे. नवाब मलिक महाराष्ट्राचे कोरोनाचे आकडे कमी दिसावेत म्हणून चाचण्या कमी केल्याची लोकांची शंका जुनीच आहे. तुमचे हे वक्तव्य त्याची कबुली दिसते. खरे काय ते सांगा. उगाच पत्रकारांच्या मागे लपू नका. सरकार पत्रकार चालवतात का?,” असंही त्यांनी नमूद केलं.