स्पर्धा परीक्षांचे मोफत ‘कोचिंग’ पुण्यातच का ? पिंपरी-चिंचवडसह अन्य शहरांतही सुविधा द्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:58 IST2026-03-27T15:42:26+5:302026-03-27T15:58:56+5:30
- निवास, भोजन आणि अभ्यासिकांचे दर गगनाला : वाढत्या खर्चामुळे गरीब विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण; महाज्योती, सारथी, बार्टी, आर्टी आणि अमृत या शासकीय संस्थांकडून अपेक्षा

स्पर्धा परीक्षांचे मोफत ‘कोचिंग’ पुण्यातच का ? पिंपरी-चिंचवडसह अन्य शहरांतही सुविधा द्या
पिंपरी : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुणे प्रमुख केंद्र बनले आहे. दर्जेदार मार्गदर्शन आणि चांगल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. मात्र, वाढत्या महागाईमुळे निवास, भोजन आणि अभ्यासिकांचे दर गगनाला भिडल्याने ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांवर ताण आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह अन्य शहरांतही अशी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी पुढे आली आहे.
राज्यातील महाज्योती, सारथी, बार्टी, आर्टी आणि अमृत या शासकीय संस्थांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग व विद्यावेतनाची सुविधा दिली जाते. मात्र, या सर्व प्रशिक्षणाचे केंद्रीकरण प्रामुख्याने पुण्यातच झाल्याने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश आणि कोकणातील विद्यार्थी येथे स्थलांतरित होत आहेत. विशेषतः सदाशिव पेठ व परिसरातील कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरत आहेत.
दरम्यान, वाढत्या खर्चामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून, काहींना शिक्षण अर्धवट सोडून गावी परतावे लागत आहे. सध्या आखाती युद्धामुळे गॅस टंचाई निर्माण झाली. अशा परिस्थितीत खाणावळी बंद झाल्या. शिवाय घरभाड्यामध्ये वाढ झाली आहे.
कोचिंग क्लासेससाठी विद्यार्थ्यांना दरमहा १० ते १२ हजारांचे विद्यावेतन मिळते. हे १० ते ११ महिन्यांचे विद्यावेतन वाढत्या खर्चाच्या तुलनेत अपुरे पडत असल्याने विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचे जिल्हास्तरावर विकेंद्रीकरण करण्याची मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतर शहरांमध्ये दर्जेदार कोचिंग सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांचा स्थलांतराचा खर्च कमी होऊन त्यांना स्थानिक पातळीवरच अभ्यास करता येईल, असे मत व्यक्त होत आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षांसाठी पुणे शहरात चांगले शैक्षणिक वातावरण आणि दर्जेदार कोचिंग क्लासेस उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. विशेषतः सदाशिव पेठ परिसर विद्यार्थ्यांची पहिली पसंती ठरत आहे. मात्र, भविष्यात इतर शहरांमध्येही कोचिंग क्लासेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. - मिलिंद नारिंगे, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती
ठराविक कोचिंग क्लासेसच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वेळापत्रकातील विसंगती तसेच क्लासेसच्या अभ्यास साहित्याचा सक्तीने वापर करावा लागत असल्याने गैरसोय होते. या प्रक्रियेत बदल करण्याची गरज आहे. - राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती
पुण्यातील वाढत्या भाडे, भोजन आणि इतर दैनंदिन खर्चामुळे शासनाकडून मिळणारे १० ते ११ महिन्यांचे विद्यावेतन अत्यंत अपुरे पडत आहे. गरीब विद्यार्थ्यांना महिनाभराचा खर्च भागवणेही कठीण झाले आहे. पुण्यातील केंद्रीकरण मोडून काढून प्रत्येक जिल्ह्यात अशी सुविधा उपलब्ध केल्यास स्थलांतराचा आणि राहण्याचा मोठा खर्च वाचू शकतो. -भागवत जोकारे, विद्यार्थी प्रतिनिधी