Pimpari-chinchwad: हा तर शहराचा अवमान, जबाबदारीने विधाने करा..! ‘पिंपरी-चिंचवडला ओळखतं कोण’ विधानावर आयुक्तांबद्दल नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:53 IST2026-04-01T12:53:31+5:302026-04-01T12:53:59+5:30
महापालिकेत गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सूर्यवंशी यांची पत्रकार परिषद झाली.

Pimpari-chinchwad: हा तर शहराचा अवमान, जबाबदारीने विधाने करा..! ‘पिंपरी-चिंचवडला ओळखतं कोण’ विधानावर आयुक्तांबद्दल नाराजी
पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवडला या जगात ओळखतं कोण?’ या विधानाने महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. वादग्रस्त वक्तव्यामुळे शहरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विधानाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिकेत गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सूर्यवंशी यांची पत्रकार परिषद झाली. एका प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त सूर्यवंशी म्हणाले, ‘गांधर्व मंचाला जगभरात ओळख मिळाली आहे, मात्र पिंपरी-चिंचवड शहराला कोणी ओळखत नाही,’ त्यावरून आयुक्त ट्रोल झाले आहेत.
शहराच्या विकासाबाबत बोलताना नवनियुक्त आयुक्त सूर्यवंशी आणि प्रशासनाने वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहून विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे. आधीच्या काही आयुक्तांनी शहराच्या विकासात मोलाची भर घातली. त्याच धर्तीवर सूर्यवंशी यांनीही काम करावे.
-विलास लांडे, माजी आमदार
अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर पंधरा दिवसांत त्या शहराबद्दल पूर्ण माहिती न घेता असे विधान करणे जबाबदारीचे लक्षण नाही. अनवधानाने त्यांच्याकडून हे वाक्य उच्चारले गेले असेल, असे समजूया; पण मुळात गांधर्व महाविद्यालय व महापालिका यांची तुलनाच होऊ शकत नाही. -संदीप तापकीर, अध्यक्ष, इंद्रायणी साहित्य परिषद
आयुक्तांचे विधान बेजबाबदार आणि शहराच्या अस्मितेला धक्का देणारे आहे. टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, फोक्सवॅगन, बजाज ऑटो यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या उद्योग संस्था येथे आहेत. संत तुकाराम महाराजांची पावनभूमी देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ही तीर्थक्षेत्रे याच परिसरात आहेत. महासाधू मोरया गोसावी आणि चापेकर यांची ही कर्मभूमी आहे. - अमित गोरखे, आमदारआयुक्त नवीन आहेत. शहराला गौरवशाली धार्मिक, आध्यात्मिक आणि औद्योगिक प्रगतीचा इतिहास आहे. आयुक्तांनी त्याचा गांभीर्याने अभ्यास करावा. त्यानंतरच जबाबदारीने विधाने करावीत. हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाच्या अभिमानाचे शहर आहे. त्याची ओळख जगभर आहे. - भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते
पिंपरी-चिंचवड लाखो हातांना काम देणारी उद्यमनगरी आहे. संत मोरया गोसावींच्या पदस्पर्शाने पावन झालेली, ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराजांच्या भक्तीने फुललेली आणि स्वातंत्र्यवीर चापेकरांच्या बलिदानाने घडलेली भूमी आहे. या शहराचे अस्तित्वच त्याची सर्वात मोठी ओळख आहे. - सीमा सावळे, माजी सभापती, स्थायी समिती
आयुक्तांनी बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केले आहे. आयुक्त पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे शहराचा अपमान करणे निषेधार्ह आहे. शहराची ओळख नाकारणे, हा येथील कष्टकरी जनता आणि उद्योजकांचा अपमान आहे. शहराचा गौरव वाढवण्याऐवजी शहराची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. - सचिन काळभोर, नागरिक