pimpari-chinchwad : विरोधकांना न जुमानता ‘तो’ विषय विनाअट विषय मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:37 IST2026-03-17T13:34:49+5:302026-03-17T13:37:03+5:30
- छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाच्या निविदेवरून गदारोळ

pimpari-chinchwad : विरोधकांना न जुमानता ‘तो’ विषय विनाअट विषय मंजूर
पिंपरी : छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या कामाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेवर विरोधकांचा हल्लाबोल सुरू आहे. ठेकेदारांनी रिंग करून स्वतःचे खिसे भरले, असा आरोप स्थायी समितीच्या मागील बैठकीत आणि महासभेत झाला. त्यामुळे स्थायी समितीने दोन विषय तहकूब केले होते. मात्र, सत्ताधारी भाजपने बुधवारी होणारी सभा सोमवारीच घेतली. विरोधाला न जुमानता विनाअट विषय मंजूर केला.
मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. तेथे स्थापत्य आणि विद्युतचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, अन्य सर्व कामे ३० टक्के कमी दराने झाली असताना, पुतळ्याचे काम निविदा दराच्या एक टक्कादेखील कमी दर केला नाही. निविदा प्रक्रियेत ५० कोटींच्या कामांमध्ये सुमारे १५ कोटी रुपयांची रिंग झाल्याचा आरोपही स्थायी समितीत झाला होता. त्यामुळे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी दोन विषय तहकूब केले. याचे पडसाद महासभेतही उमटले होते. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने टीका केली होती.
या विषयावर दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने मांडली होती. निविदा रक्कम कमी करावी, अशीही मागणी झाली होती. मात्र, आठवड्याची बैठक बुधवारी होत असताना दोन दिवस अगोदर सोमवारी विशेष बैठक बोलावली. यातही विरोधकांनी आक्षेप घेतला. मात्र, विषय मंजूर केला. अध्यक्ष अभिषेक बारणे म्हणाले, गेल्या चार दिवसांत विरोधकांनी केवळ राजकारण केले. मात्र, त्यांनी कोणत्याही शंकांचे निरसन केले नाही किंवा ठोस काहीही मांडले नाही.
५० कोटींच्या निविदेत अत्यंत गंभीर त्रुटी
स्थायी समितीच्या सदस्या सुलभा उबाळे म्हणाल्या, मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरण, स्थापत्य आणि विद्युत कामांच्या निविदेबाबत आक्षेप आहेत. संभाजी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आणि अस्मितेचा विषय आहेत. त्यांच्या स्मारकाचे काम अत्यंत पारदर्शक आणि दर्जेदार होणे अपेक्षित आहे. अशा पवित्र कामात भ्रष्टाचाराचे आरोप होणे दुर्दैवी आहे. ५० कोटींच्या प्रकल्पाच्या निविदेत अत्यंत गंभीर त्रुटी आणि संशयास्पद बाबी दिसून आहेत. याबाबत आयुक्तांना पत्र दिले आहे आणि निषेधही नोंदविला जाणार आहे.