Pimpari-chinchwad: थकीत रक्कम भरा, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा तोडणार; जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:14 IST2026-03-22T15:13:41+5:302026-03-22T15:14:11+5:30
- जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा : १४३ काेटींची थकबाकी; पाणीपट्टी भरण्यास विलंबासह पाणी शुद्ध करत नसल्याचा ठपका; ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांच्या ताेंडचे पाणी पळण्याची भीती

Pimpari-chinchwad: थकीत रक्कम भरा, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा तोडणार; जलसंपदा विभागाचा महापालिकेला इशारा
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी आणि पाणी शुद्ध करत नसल्याचा ठपका ठेवत आकारलेला दंड अशी १४३ काेटींची थकबाकी तत्काळ भरावी, अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शहरवासीयांच्या ताेंडचे पाणी पळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला प्रामुख्याने मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. पवना नदीवरील रावेत बंधारा येथून महापालिका ५५० एमएलडी अशुद्ध पाणी उचलते. हे पाणी निगडी, प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध केले जाते. त्यानंतर येथून शहरातील विविध भागांतील पाणी टाक्यांमध्ये वितरित केले जाते. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढताच अपुऱ्या, कमी दाबाने, अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. महापालिकेच्या सारथी हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडत आहे.
महापालिकेकडून अधिक पाण्याचा वापर
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मंजूर काेट्यापेक्षा जास्त पाणी वापरले जाते. मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे महापालिकेने मर्यादेमध्येच पाण्याचा वापर करावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने दिली आहे. मात्र, महापालिका मंजूर असलेल्या काेट्याप्रमाणेच पाणी उचलते, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
२७५ एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पाणी शुद्ध करण्याची क्षमता ३४५ एमएलडी आहे. प्रत्यक्षात महापालिकेकडून केवळ २७५ एमएलडी पाणी शुद्ध केले जाते. त्यामुळे उर्वरित पाण्यावर प्रक्रिया न करता नदीत साेडले जात असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी सिंचनास उपलब्ध करून दिले जात नसल्याचा ठपकाही ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेला जलसंपदा विभागाकडून दंड आकारण्यात येत आहे.
महापालिकेकडून पाणीपट्टी नियमित भरली जाते. गुरुवारी रात्रीच आठ कोटी सहा लाखांची पाणीपट्टी भरली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यामुळे जलसंपदा विभागाकडून दंड आकारला जात आहे. थकबाकी भरण्याबाबत जलसंपदा विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. - प्रमाेद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका.