लग्नसराई ठप्प, गुलाबाला नाही भाव; शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:35 IST2026-03-19T17:35:32+5:302026-03-19T17:35:41+5:30
- मागणी घटली, खतांचे दरही वाढले, उत्पादन खर्चही वसूल होईना

लग्नसराई ठप्प, गुलाबाला नाही भाव; शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले
- गोविंद बर्गे
पिंपरी : निर्यातक्षम डच गुलाबासाठी ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांवर सध्या दुहेरी संकट कोसळले आहे. गॅस टंचाईमुळे लग्नसोहळे व इतर कार्यक्रम पुढे ढकलले गेल्याने गुलाबाची मागणी अचानक घटली आहे, तर खतांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. परिणामी त्यांच्या अर्थकारणाला मोठा फटका बसत आहे.
मावळमध्ये सुमारे १० ते १२ हजार शेतकरी डच गुलाबाची शेती करतात. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील व्हेलेंटाईन डेचा निर्यातीचा हंगाम संपल्यानंतर या शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून रहावे लागते. दरवर्षी मार्च ते जुन या कालावधीत लग्नसराईमुळे गुलाबाला चांगला दर मिळतो. मात्र, यंदा आखाती युद्धामुळे परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. स्थानिक बाजारात एका गुलाबाला मिळणारा दर १० रुपयांवरून थेट २ रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होणे कठीण झाले आहे.
पंधरा दिवसांत कोट्यवधींचे नुकसान
आखाती युद्धामुळे इंधन आयातीत अडथळे निर्माण झाल्याने गॅस टंचाई वाढली. त्याचा फटका हॉटेल व केटरिंग व्यवसायाला बसून अनेक समारंभ पुढे ढकलले. परिणामी फुलांच्या मागणीत मोठी घट झाली. याच काळात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊन दर वाढल्याने मावळातील गुलाब उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांतच सुमारे २० ते २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.