स्थायी समितीत कोट्यवधींचे प्रस्ताव, पण स्पष्टता नाही; सर्वसाधारण सभेत मात्र मंजुरीचा सपाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 16:25 IST2026-03-13T16:08:52+5:302026-03-13T16:25:31+5:30
- टीडीआर, जकात नाक्यांच्या जागांचा वापर, पर्यावरण अभियांत्रिकी कामे

स्थायी समितीत कोट्यवधींचे प्रस्ताव, पण स्पष्टता नाही; सर्वसाधारण सभेत मात्र मंजुरीचा सपाटा
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहर विकासाशी संबंधित कोट्यवधीच्या प्रस्तावांचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. मात्र, या प्रस्तावांच्या खर्चाबाबत आणि त्यातून शहराला होणाऱ्या प्रत्यक्ष फायद्याबाबत ठोस माहिती नसल्याने पुन्हा एकदा मंजुरीचा सपाटा लावला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) संबंधित प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. शहरातील काही भूखंड आणि विकास आराखड्यातील आरक्षणांबाबत टीडीआर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयांमुळे जमीनमालकांना मोठ्या प्रमाणावर विकास हक्क मिळणार असून, त्याचा आर्थिक परिणाम कोट्यवधी रुपयांमध्ये होणार आहे. मात्र, या व्यवहारांमुळे महापालिकेला नेमका किती फायदा होणार, याबाबत स्पष्टता नाही.
पर्यावरण अभियांत्रिकी विभागाशी संबंधित काही कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचाही विषय अजेंड्यावर आहे. शहरातील पायाभूत सुविधा, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि नागरी सेवा सुधारण्यासाठी ही कामे प्रस्तावित असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यासाठी होणारा खर्च मोठा आहे. कोट्यवधींच्या प्रस्तावांवर पुरेशी चर्चा न होता केवळ औपचारिक मंजुरी दिली जाणार का, असा सवाल आहे.
काही समित्यांवरील प्रतिनिधींची नियुक्ती, आधी घेतलेल्या निर्णयांना मंजुरी आणि प्रशासकीय बाबींचे विषयही सभेत ठेवण्यात आले आहेत. मात्र, शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि आर्थिक शिस्त या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून केवळ प्रस्तावांना मंजुरी देण्याची परंपरा कायम राहणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जागांचा नेमका वापर कशासाठी?
शहरातील जुन्या जकात नाक्यांच्या जागांचा वापर बदलण्यासंबंधीही प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आले आहेत. सुमारे १०० चौरस मीटर परिसरातील या जागा विविध प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, या जागांचा नेमका वापर कशासाठी आणि त्यातून शहराला काय लाभ होणार, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.