'व्हॅलेंटाइन्स डे'साठी केझ कायम; मावळचा लाल गुलाब पोहोचला थेट परदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:02 IST2026-02-11T18:02:28+5:302026-02-11T18:02:51+5:30
- उत्पादनात यंदा दुपटीने वाढ; ५० ते ५५ लाख फुले निर्यात होण्याचा अंदाज; दरवाढीमुळे शेतकरी समाधानी

'व्हॅलेंटाइन्स डे'साठी केझ कायम; मावळचा लाल गुलाब पोहोचला थेट परदेशात
- आकाश झगडे
पिंपरी : 'व्हॅलेंटाइन्स डे' जवळ येत असतानाच, मावळातील गुलाबाला मागणी वाढली आहे. येथील पॉलीहाऊसमध्ये जानेवारीपासूनच गुलाबाच्या काढणीची आणि पॅकिंगची लगबग सुरू आहे. पवना संस्कृतीअंतर्गत होणाऱ्या उत्पादनात यंदा दुपटीने वाढ झाली आहे. स्थानिक आणि परदेशी बाजारपेठेत या गुलाबाला चांगला भाव मिळत आहे.
तालुक्यात ४५० ते ५०० हेक्टर क्षेत्रावर गुलाबाची शेती होते. गेल्यावर्षी सुमारे साडेचार ते पाच कोटी गुलाबाच्या फुलांचे उत्पादन झाले होते. यंदा ५० ते ५५ लाख फुले निर्यात होण्याचा अंदाज आहे. यामुळे २५ ते ३० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळणार आहे. यंदा थंडीचा कडाका कमी-जास्त होणे आणि ढगाळ हवामानामुळे उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, फुलांचा दर्जा उत्कृष्ट असल्याने मागणी अधिक आहे गेल्या वर्षी १६ ते १८ रुपये असलेला निर्यात होणाऱ्या फुलांचा दर यंदा २० रुपयांच्या आसपास आहे. दरामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कोलकाता, बंगळुरू आणि चंदीगडला विक्री
अमेरिका, हॉलंड (नेदरलँड्स), जपान, ब्रिटन, दुबई (युएई), सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांसह देशांतर्गत दिल्ली, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, बंगळुरू आणि चंदीगड या बाजारपेठांत मावळचा गुलाब जात आहे. या गुलाबाला आता मागणी वाढली आहे.असा आहे दर गेल्या वर्षी स्थानिक बाजारपेठेत गुलाबाला १८ ते २० रुपये दर मिळला होता. तो यंदा २५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. परदेशी बाजारपेठेतील २० रुपये दरापेक्षा पाच रुपये जादा मिळतात.
परदेशात पाठवण्याचा असा असतो प्रवास...
फुले खुडल्यानंतर ती तातडीने प्रतवारी करून स्थानिक बाजारपेठेत पाठवली जातात. मात्र, परदेशात गुलाब पाठवण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. खुडल्यानंतर ती तीन ते चार अंश तापमानात प्री-कूलिंग रूममध्ये ठेवली जातात. वीस फुलांचा एक गुच्छ बनवून तो विशेष कोरोगेटेड बॉक्समध्ये ठेवला जातो. हे बॉक्स कोल्ड स्टोअरेज असलेल्या व्हॅनमधून मुंबईच्या विमानतळावर नेले जातात. निर्यातीपूर्वी केंद्र सरकारकडून कीडमुक्त असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते.
जादा उत्पादनासोबत काळजीही घ्यावी लागते. पॉलीहाऊसमध्ये उत्पादन घेणाऱ्या व परदेशात फुले पाठवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याकडे शीतगृह असणे गरजेचे आहे. निर्यातीसाठी शेतकरी एकत्र आले पाहिजेत. सरकारकडून छोटी शीतगृहे उभारली गेली पाहिजेत. - ज्ञानेश्वर ठाकर, सचिव, पवना फूल उत्पादक संघ