बीज सोहळ्यानिमित्त देहूतील इंद्रायणीचे पाणी वापरावर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:28 IST2026-02-25T13:27:13+5:302026-02-25T13:28:43+5:30
- सोहळा कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी श्रीक्षेत्र देहू येथे उपस्थित राहणार आहेत.

बीज सोहळ्यानिमित्त देहूतील इंद्रायणीचे पाणी वापरावर बंदी
पिंपरी : श्रीक्षेत्र देहू येथे ३ ते ५ मार्च या कालावधीत आयोजित संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासह स्वयंपाकासाठी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
सोहळा कालावधीत महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक व वारकरी श्रीक्षेत्र देहू येथे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार देहू येथील इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरांवरील पाणी पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई केली आहे. नदीचे पाणी पिण्यास वापरू नये. भाविकांनी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळांचा वापर करावा. नदीपात्रात कपडे धुणे किंवा पाणी दूषित होईल, असे कोणतेही कृत्य करू नये. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डुडी यांनी दिला आहे.
संसर्गजन्य रुग्णांना देहू हद्दीत प्रवेशास प्रतिबंध
बीज सोहळा कालावधीत देहू नगरपंचायत हद्दीतील सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक जागेत संसर्गजन्य रुग्णांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित क्षेत्रात कोणताही संसर्गजन्य रुग्ण आढळल्यास देहू नगरपंचायतीने तयार केलेल्या शेडमध्ये त्यांना राहणे बंधनकारक राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.