Pimpari-Chinchwad : महापालिकेसाठी अजितदादा गटाचा सवतासुभा;राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 17:00 IST2025-11-07T16:59:36+5:302025-11-07T17:00:16+5:30
- मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आग्रह; पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद; काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचे सूतोवाच

Pimpari-Chinchwad : महापालिकेसाठी अजितदादा गटाचा सवतासुभा;राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या तयारीत
पिंपरी : महापालिका निवडणुकीत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सवतासुभा मांडला आहे. याबाबत गुरुवारी (दि. ६) मुंबईतील वरळीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत शहरातील नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरला. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वबळासह काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल, असेही सूचित केले.
राज्यात नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठक मुंबईत सायंकाळी झाली. शहरातील पदाधिकाऱ्यांना तासाभराचा वेळ देण्यात आला होता. यावेळी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नाना काटे, माजी उपमहापौर राजू मिसाळ आदी उपस्थित होते.
स्थानिक नेत्यांनी आपापली मते मांडली. त्यानंतर पवार यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण सोडत झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेऊ. निवडणुकीसाठी मतदार याद्या पाहून घ्या, तयारी करा, अशा सूचना पवार यांनी दिल्या. शहराची नवीन कार्यकारिणी लवकर जाहीर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.
स्वबळावरच लढले पाहिजे : नेत्यांची मागणी
सुरुवातीला शहरातील निवडणुकीबाबत पवार यांनी आढावा घेतला. स्थानिक नेत्यांनी शहरातील पक्षाची परिस्थिती सांगितली. पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादीचा गड कायम ठेवण्यासाठी स्वबळावरच लढले पाहिजे, अन्यथा सत्ता पुन्हा हातातून जाईल, असे सर्वच नेत्यांनी सांगितले. भाजप किंवा शिवसेनेबरोबर युती करू नये. युती केल्यास आपल्या उमेदवारावर अन्याय होईल, असे शहरातील नेत्यांनी सांगितले. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोण कोणाचा पत्ता कट करणार नाही
अजित पवार म्हणाले की, महापालिका निवडणुकीची स्थानिक पातळीवरील पार्श्वभूमी पाहता, ही निवडणूक स्वबळावर लढावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे. पिंपरी-चिंचवडमध्ये आपण खूप काम केले आहे. २०१७ चा अपवाद वगळता शहरात वर्चस्व राहिले आहे. आता ते कायम राखावे. इतर पक्षांमध्ये दिल्लीला विचारावे लागते. मात्र, आपल्याकडे असे नाही. मागील वेळी काम केले नाही म्हणून कोण कोणाचा पत्ता कट करेल, असे काही होणार नाही, माझे थेट लक्ष असेल. काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला मैत्रीपूर्ण लढत करावी लागेल.