मावळात सुनील शेळकेंचा ‘मास्टरस्ट्रोक’...! तेरा संचालकांचे राजीनामे, बाजार समिती बरखास्त होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:41 IST2026-04-08T15:40:36+5:302026-04-08T15:41:06+5:30
Maharashtra market committee - तेरा संचालकांचे राजीनामे, मावळ कृषी उत्पन्न बाजार समिती अल्पमतात

मावळात सुनील शेळकेंचा ‘मास्टरस्ट्रोक’...! तेरा संचालकांचे राजीनामे, बाजार समिती बरखास्त होणार?
वडगाव मावळ : आमदार सुनील शेळके यांच्या आदेशानंतर मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रवादीच्या १३ संचालकांपैकी सोमवारी ९ आणि मंगळवारी ४ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती अल्पमतात आली आहे. लवकरच बाजार समिती बरखास्त होणार? याबाबतची चर्चा मावळात रंगली आहे. याबाबतचा निर्णय दि. ९ ला होणार असल्याची चर्चा आहे.
मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १८ पैकी १३ सदस्य होते. मात्र, नुकत्याच झालेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपाचे ५ संचालक असताना सभापतीपदी भाजपचे सुभाष जाधव हे विजयी झाले होते. सभापतीपद भाजपकडे गेल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता होती. त्यामुळे आमदार सुनील शेळके यांनी नवी खेळी खेळली. तेरा संचालकांना पदाचे राजीनामे देण्याची सूचना केली. राजीनामा न दिल्यास पक्षातून हकालपट्टी केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे आजअखेर सर्व १३ संचालकांनी पदाचे राजीनामे सहायक निबंधक वडगाव मावळ येथे दिले आहेत.
बाजार समितीच्या ९ एप्रिलच्या बैठकीकडे लक्ष
संचालकांनी वडगाव मावळ येथे सहायक निबंधक यांच्याकडे राजीनामे दिले असले तरी राजीनामे जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे गेले तरी राजीनामे संचालकांच्या बैठकीतच ते मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे येत्या ९ तारखेला होणाऱ्या बाजार समितीच्या बैठकीत राजीनामाबाबत निर्णय होऊन राजीनामे मंजूर झाले तर बाजार समिती बरखास्त होईल किंवा आणखी कोणती राजकीय घडामोडी होऊ शकतात. यावर बाजार समितीचे भवितव्य अवलंबून आहे. दोन वर्षाचा कार्यकाल शिल्लक असताना त्यामुळे राष्ट्रवादी बाजार समितीची सत्ता सोडेल, असे चिन्ह सध्या दिसत नाही. त्यामुळे येत्या गुरुवारी राजकारण काय वळण घेईल? यावर बाजार समितीचे भवितव्य अवलंबून आहे.