कसा रोखणार कौटुंबिक हिंसाचार? दिवसाआड होतोय गुन्हा दाखल

By नारायण बडगुजर | Updated: June 6, 2025 14:04 IST2025-06-06T14:02:56+5:302025-06-06T14:04:48+5:30

-पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत पाच महिन्यांत ८० गुन्ह्यांची नोंद

How to prevent domestic violence? Cases are being registered day after day | कसा रोखणार कौटुंबिक हिंसाचार? दिवसाआड होतोय गुन्हा दाखल

कसा रोखणार कौटुंबिक हिंसाचार? दिवसाआड होतोय गुन्हा दाखल

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहित महिलांच्या छळाबाबत चर्चा होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत पाच महिन्यांत कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी ८० गुन्हे दाखल करण्यात आले. दिवसाआड एक गुन्हा दाखल होत असल्याचे यावरून दिसून येते. शिक्षित आणि अल्पशिक्षित, तसेच स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या विवाहितांना छळाला सामोरे जावे लागत असल्याचे अनेक प्रकरणांवरून दिसून येते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, कौटुंबिक हिंसाचार कधी थांबणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महिलांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला असला, तरी त्यांना घरात तसेच सामाजिक जीवनात छळाला सामोरे जावे लागते. यात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी विवाहित महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा अस्तित्वात आहे. सासरी होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळापासून महिलांचे या कायद्याअंतर्गत संरक्षण केले जाते. मात्र, असे असले तरी त्रास असह्य झाल्यानंतरच अनेक महिला तक्रार करण्यासाठी पुढे येतात. तोपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये उशीर झालेला असतो. त्यामुळे वेळीच तक्रार करणे किंवा वाचा फोडणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

विवाहपूर्व आणि विवाहपश्चात समुपदेशन

लग्न जुळवताना संबंधित वधू आणि वर, तसेच दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. त्यात विवाहपूर्व समुपदेशन देखील करता येते. तसेच विवाहपश्चात समुपदेशन देखील करावे. जेणेकरून वाद मिटवण्यास मदत होऊ शकते.

सामाजिक जाणीव महत्त्वाची

मोबाइल फोनमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मात्र, त्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतला जात नाही. केवळ मनोरंजन म्हणून मोबाइलचा वापर करण्यावर भर असतो. परिणामी मोबाइलमुळे वैवाहिक आयुष्यात वाद होतात. संशयातून गैरसमज आणि त्यातून भांडण होण्याचे प्रकार घडतात. त्यासाठी सामाजिक जाणीव असली पाहिजे. त्यात व्यावहारिक, तसेच सामान्य ज्ञान वाढले पाहिजे. त्यामुळे कोणत्या प्रसंगाला कसे सामोरे जावे, कुठे कसे वागावे, काय बोलावे यासह समयसूचकता असावी. यातून निर्णय क्षमता वाढीस लागून आपल्या स्वत:साठी योग्य आणि अयोग्य याबाबत जाणून घेणे शक्य होते. त्यासाठी तरुणांचा सामाजिक बुद्ध्यांक वाढला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

हुंडाबळीचे तीन गुन्हे

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाअंतर्गत चिंचवड, बावधन आणि महाळुंगे एमआयडीसी या पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण तीन गुन्हे यंदा दाखल झाले आहेत. विवाहित महिलेने तिच्या माहेरच्यांकडून पैसे, दागिने किंवा वाहन आणावे, अशी मागणी सासरच्यांकडून केली जाते. त्यासाठी छळ केला जातो. या छळाला कंटाळून महिला आत्महत्या करते. अशा घटनांमध्ये हुंडाबळीप्रकरणी गुन्हा दाखल केला जातो.

लग्न करताना केवळ प्रतिष्ठा बघू नये. यातून दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन झाले पाहिजे. सासरच्यांकडून अवास्तव मागण्या होत असल्यास वेळीच विरोध केला पाहिजे. नवदाम्पत्यांच्या संसारात नातेवाइकांनी हस्तक्षेप टाळावा. - सुलोचना भोवरे, उपाध्यक्ष, विदर्भ मित्रमंडळ

सासरच्यांकडून होणारा छळ असह्य झाल्यानंतरच विवाहित महिला किंवा तिच्या माहेरचे तक्रार करण्यासाठी पुढे येतात. असे न करता माहेरच्यांनी आणि सासरच्यांनीही वेळीच दखल घ्यावी. त्याबाबत समुपदेशन घ्यावे. कौटुंबिक हिंसाचार ही केवळ एका कुटुंबाची समस्या नाही तर सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे आले पाहिजे. - प्रकाश जुकंटवार, सामाजिक कार्यकर्ता, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

Web Title: How to prevent domestic violence? Cases are being registered day after day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.