'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
By विश्वास मोरे | Updated: June 17, 2025 19:02 IST2025-06-17T19:02:23+5:302025-06-17T19:02:55+5:30
संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्यादृष्टीकोनातून पाऊले टाकायची नाहीत, भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली.

'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
पिंपरी : ज्यांना जायचे त्यांना जाऊ द्या, आपण पुन्हा नव्याने सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्त्यांच्या बळाने यश मिळवूयात. फुले-शाहू-आंबेडकर, गांधी, नेहरू, यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पुढे जायचे आहे, हा विचार जर सगळे म्हणत असतील तर मला मान्य आहे. सत्तेसाठी भाजपसोबत जाऊन बसायचे ही भूमिका कोणी मांडत असेल तर, हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे कोणाशीही संबंध ठेवा. पण, भाजपशी संबंध ठेऊ नका. संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही. त्यादृष्टीकोनातून पाऊले टाकायची नाहीत, भाजपशी संबंध ठेवणारा काँग्रेसच्या विचाराचा असू शकत नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी मांडली.
ताथवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या संकल्प मेळाव्यात पवार बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, निरीक्षक प्रकाश म्हस्के, शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे, सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक राहुल कलाटे, सुलक्षणा धर शिलवंत, अरुण बोऱ्हाडे, देवेंद्र तायडे, इम्रान शेख उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांनी शहराची विभागणी केली
शरद पवार म्हणाले, 'सत्ताधाऱ्यांनी शहराची विभागणी केली आहे. नदीच्या, रस्त्याच्या पलीकडे आणि अलीकडे अशी शहराची वाटणी झाली आहे. हा नवीन व्यवसाय राजकारणात सुरु झाला आहे. हे स्वच्छ करायचे आहे. नदीसह शहरातील नेतृत्वाबाबतचे चित्र स्वच्छ करायचे आहे. त्यासाठी शहरात मी अधिक लक्ष घालणार आहे.'
विकास आपण केला, त्यांची चिंता करू नका
शरद पवार म्हणाले, 'जे पक्ष सोडून गेले, त्यांची चिंता करू नका, नवीन लोक आहेत. आयुष्यात अनेकदा मी अशा गोष्टी अनुभवल्या आहेत. मुख्यमंत्री असताना एकदा सरकार बरखास्त झाले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत ७० आमदार निवडून आले. दोन महिन्यांनी काही कामासाठी मी इंग्लंडला गेलो. तर, दहा दिवसात राज्यात चमत्कार झाला. ७० पैकी ६४ आमदार सोडून गेले. मला आश्चर्य वाटले. लोकांनी पाठिंबा दिला. कार्यकर्त्यांनी कष्ट केले आणि निवडून आलेले आमदार पक्ष सोडून गेले. मी चिंताग्रस्त झालो नाही. लोकांशी संपर्क वाढविला. पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत जे सोडून गेले, त्यातील ९० टक्के लोकांचा पराभव झाला.'
महिला, तरुणांना संधी दिली जाईल
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले, 'महापालिका निवडणुकीत महिला, तरुणांना संधी दिली जाईल. प्रत्येक प्रभागात नवीन नेतृत्व तयार केले जाईल. पिंपरी-चिंचवड महापालिका अनेक वर्षे काँग्रेसच्या विचाराकडे होती. मध्यंतरी गडबड झाली आणि भाजपची सत्ता आली. हे चित्र बदलायचे आहे.;
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, 'स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट वाहतूक, पदपथ यावर पंधराशे कोटी खर्च केले. सीसीटीव्ही कधी सुरु होणार, बांगलादेशी रोहिंगे म्हणून कुदळवाडीवर बुलडोजर फिरविला. किती रोहिंगे सापडले. चार हजार लघु उद्योग देशोधडीला लागले. प्रशासकीय राजवटीत आलेला विकास आराखडा एकतर्फी आहे. निळी रेषा बदलली आहे. कुणाच्या फायद्यासाठी? मुळा, पवना आणि इंद्रायणीचे प्रदूषण रोखण्यापेक्षा त्यावर ब्युटिफिकेशन सुरु आहे. चुकीच्या कारभाराला आला घालण्यासाठी सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरायला हवे.'