बत्ती गुल..! आकुर्डी, गंगानगरमध्ये वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:08 IST2026-02-05T17:07:41+5:302026-02-05T17:08:19+5:30
आकुर्डी : सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गंगानगर, आकुर्डी गावठाण, दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

बत्ती गुल..! आकुर्डी, गंगानगरमध्ये वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप
आकुर्डी : सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे गंगानगर, आकुर्डी गावठाण, दत्तवाडी, विठ्ठलवाडी परिसरात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सततच्या बत्ती गुलमुळे विद्युत उपकरणे खराब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
गंगानगर भागामध्ये हनुमान मंदिर परिसरात अनेक वेळा खंडित वीजपुरवठा होत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली सातत्याने कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. रात्री, अपरात्री, तसेच दिवसाही अनेक वेळा बत्ती गुलमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आकुर्डी गावठाणातील हनुमान मंदिर परिसर, प्लाझा, गुरुदेवनगर, पंचतारानगर येथे सातत्याने वीज गायब होत आहे. किमान तीन ते चार तास वीजपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे गृहिणी, तसेच वर्क फ्रॉम होम काम करणारी आयटी कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
दत्तवाडी, विठ्ठलवाडी, श्रीकृष्ण नगर, विठ्ठल मंदिर, तसेच आकुर्डी मंडई परिसरामध्ये खंडित वीजपुरवठा नेहमीचीच समस्या ठरली आहे. नागरिकांनी महावितरणकडे तक्रारीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही. बत्ती गुलची समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.