तीन वर्षांत सोलापूर-पुणे-मुंबई ‘वंदे भारत’मधून २३ लाख जणांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 13:53 IST2026-02-13T13:51:36+5:302026-02-13T13:53:43+5:30
- घाट माथ्यावरही सुसाट धाव; पुणे-मुंबई मार्गावर साडेतेरा लाख प्रवासी

तीन वर्षांत सोलापूर-पुणे-मुंबई ‘वंदे भारत’मधून २३ लाख जणांचा प्रवास
पुणे :पुणे-सोलापूर रेल्वे विभागातून सुरू झालेल्या सोलापूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसने तीन वर्षांत २३ लाखांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. ९ फेब्रुवारी २०२३ रोजी साेलापूर- मुंबईदरम्यान वंदे भारत सुरू झाली होती. जानेवारी २०२६ अखेरपर्यंत या गाडीची सरासरी १०२.२७ टक्के ऑक्युपन्सी नोंदली गेली असून, तब्बल २३ लाख ४३ हजार नागरिकांनी यातून प्रवास केला आहे.
वंदे भारत एक्स्प्रेसने सोलापूर, पुणे आणि मुंबईदरम्यान आर्थिक, सामाजिक तसेच धार्मिक पर्यटनाला चालना दिली आहे. वेगवान प्रवास, अत्याधुनिक सुविधा आणि वेळेची बचत यामुळे ही सेवा नियमित प्रवाशांसाठी वरदान ठरली आहे. आधुनिक ‘पुश-अँड-पूल’ तंत्रज्ञानामुळे भोर घाटासारख्या अवघड घाट विभागातून बँकर लोकोशिवाय ही गाडी धावते. दरम्यान पुणे-मुंबई-पुणे या मार्गावर तीन वर्षांत सुमारे साडेतेरा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. सकाळच्या वेळी अतिरिक्त जलद सेवा उपलब्ध झाल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी जाणारे आणि सायंकाळी परतणारे प्रवासी या गाडीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या मार्गावर कायम प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
------
वेळेची बचत, २० डब्यांचा रेक : सोलापूर-पुणे-मुंबई असा सुमारे ४५५ किलोमीटरचा प्रवास ही गाडी अवघ्या ६ तास ३० मिनिटांत पूर्ण करते. सुपरफास्ट गाड्यांच्या तुलनेत सुमारे दीड तासांची बचत होत आहे. कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर हे या गाडीचे प्रमुख थांबे असून, आठवड्यातून सहा दिवस गाडी धावते. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२५ मध्ये १६ डब्यांच्या रेकऐवजी २० डब्यांचा रेक जोडण्यात आला. त्यामुळे आसनक्षमता १,४४० पर्यंत वाढली असून, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
------
तीन वर्षांची कामगिरी
- एकूण प्रवासी संख्या : २३ लाख ४३ हजार
- सरासरी ऑक्युपन्सी : १०२.२७ टक्के
- प्रवासाचे अंतर : ४५५ किमी
- एकूण वेळ : ६ तास ३० मिनिटे
- आसनक्षमता : १,४४० (२० डबे)
------
मार्गनिहाय प्रवासी संख्या :
- पुणे ते मुंबई -- ६ लाख ७४ हजार
- मुंबई ते पुणे -- ६ लाख ७३ हजार
- सोलापूर ते पुणे - २ लाख २० हजार
- पुणे ते सोलापूर - १ लाख ७० हजार
---
‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान आणि आरामदायी झाला आहे. या गाडीला पुण्यातून कायम गर्दी असते. आगामी काळातही या गाडीला मागणी वाढण्याची शक्यता आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे