Travel : लडाखच्या टोकावर वसलेलं भारताचं 'शेवटचं' गाव! निसर्गाचा असा आविष्कार की काश्मीरही विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 22:19 IST2026-03-29T22:15:23+5:302026-03-29T22:19:48+5:30

भारताच्या नकाशावर अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आजही जगाच्या नजरेपासून काहीशी दूर आहेत.

भारताच्या नकाशावर अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आजही जगाच्या नजरेपासून काहीशी दूर आहेत. लडाखच्या दुर्गम भागात, भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ वसलेले 'तुरतुक' हे असेच एक गाव.

लेहच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या गावाला 'भारताचे शेवटचे गाव' म्हटले जाते. निळाशार आकाश, उत्तुंग डोंगररांगा, खळाळणाऱ्या नद्या आणि शांतता... हे सर्व अनुभवण्यासाठी तुरतुक हे कोणत्याही नंदनवनापेक्षा कमी नाही.

तुरतुकचा इतिहास अतिशय रंजक आणि ऐतिहासिक आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धापूर्वी हे गाव पाकिस्तानचा भाग होते. मात्र, युद्धानंतर हे गाव भारताच्या ताब्यात आले आणि तेव्हापासून ते भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनले आहे.

सीमेपासून अवघ्या ८ किलोमीटरवर असलेल्या या गावात आजही 'बाल्टी' संस्कृतीची मुळे घट्ट आहेत. येथील भाषा, पेहराव आणि राहणीमान लडाखच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळे असून ते पर्यटकांना भुरळ घालते.

निसर्गप्रेमींसाठी तुरतुक म्हणजे पर्वणीच! एप्रिल महिन्यात जेव्हा खुबानीची झाडे फुलांनी बहरतात, तेव्हा हे गाव एखाद्या गुलाबी स्वप्नासारखे दिसते. येथील 'तुरतुक धबधबा' आणि आजूबाजूला पसरलेली शांतता तुम्हाला शहरातल्या धावपळीचा पूर्णपणे विसर पाडते.

जर तुम्हाला इतिहासात रस असेल, तर येथील 'बाल्टी हेरिटेज हाऊस आणि म्युझियम'ला नक्की भेट द्या. दगड आणि लाकडापासून बनवलेल्या या घरात बाल्टी संस्कृतीच्या जुन्या वस्तू, वेशभूषा आणि १९७१ च्या युद्धाच्या काही खुणा आजही जतन करून ठेवल्या आहेत.

तुरतुकला पोहोचण्यासाठी तुम्हाला आधी लडाखची राजधानी 'लेह' गाठावे लागेल. लेहपासून तुरतुकचे अंतर साधारण २०५ किलोमीटर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे गाव सीमावर्ती भागात असल्याने येथे जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून 'इनर लाईन परमिट' घ्यावे लागते. लेहवरून तुम्ही खाजगी टॅक्सी किंवा बसने नुब्रा व्हॅलीमार्गे येथे पोहोचू शकता.

काय बघाल? येथील जुनी संस्कृती जाणून घेण्यासाठी बाल्टी म्युझियम, खुबानीच्या बागांचा मनमोहक नजारा बघण्यासाठी एप्रिकॉट फार्म्स, पूर्वजांनी अन्न टिकवून ठेवण्यासाठी विकसित केलेली नैसर्गिक पद्धत पाहण्यासाठी नॅचरल कोल्ड स्टोरेज आणि राजघराण्याचा इतिहास आणि वारसा बघण्यासाठी शाही वाडा नक्की बघा.