मुकेश अंबानी Reliance Jioच्याच 4G मायाजालात गुरफटले; 5G वर सरकारचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 07:41 PM2021-02-09T19:41:48+5:302021-02-09T19:47:28+5:30

Mukesh Ambani Reliance Jio, 5G network : केंद्र सरकारने देशात 5G कधी येणार यावर मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे सरकारकडे 5जी नेटवर्क ट्रायलसाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने मागितलेल्या परवानगीला मोठा धक्का बसला आहे.

केंद्र सरकारने देशात 5G कधी येणार यावर मोठे वक्तव्य केले आहे. सरकारनुसार यंदा काही 5जी भारतात येणे शक्य नाहीय. यामुळे देशात 5G नेटवर्कची सुरुवात 2022 मध्येच होण्याची शक्यता आहे.

यामुळे सरकारकडे 5जी नेटवर्क ट्रायलसाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने मागितलेल्या परवानगीला मोठा धक्का बसला आहे.

संसदेच्या पॅनेलने याबाबत माहिती दिली आहे. पुढील सहा महिन्यांत देशात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार आहे. यानंतरच भारतात 5G सेवा सुरु होऊ शकणार आहे. ही सेवा 2022 मध्येच सुरु होईल.

पॅनेलचे प्रमुख आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सांगितले की, 5जी सेवा 2021 च्या शेवटी किंवा 2022 च्या सुरुवातीला काही निवडक ठिकाणी किंवा निवडक लोकांसाठी सुरु केली जाऊ शकते. कारण 4जी सेवा भारतात कमीतकमी 5 ते 6 वर्षे सुरु राहिली पाहिजे.

संसद समितीच्या या अहवालामुळे Reliance चे सीईओ मुकेश अंबानी यांना जोरदार झटका बसण्याची शक्यता आहे. अंबानी यांनी Reliance Jio 2021 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये भारतात 5जी सेवा लाँच करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांनी तशी तयारीही सुरु केली होती.

तर एअरटेलकडूनही 5G सर्विस हैदराबादमध्ये ट्रायल केल्याची घोषणा केली गेली होती. या दोन्ही कंपन्यांना आता सरकारच्या मंजुरीची प्रतिक्षा होती.

अन्य देशांच्या तुलनेत भारताने 5जी सेवेसाठी पुरेशी तयारी केलेली नाहीय, असे या अहवालात म्हटले आहे. यामुळे अर्धवट तयारी करून पुढे जाता येणार नाही. जर सरकारने यामध्ये लक्ष घातले नाही तर भारत 2G,3G, 4G सारखाच 5जीचे फायदे घेण्यास मुकेल, अशी चिंता व्य़क्त करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे कंपन्यांनी जानेवारीमध्येच अर्ज दिले होते. तरीही ट्रायलसाठी काहीच हालचाली न केल्याचा आरोप टेलिकॉम इंडस्ट्री बॉडीने केला आहे.

टेलिकॉम मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी 1 मार्चपासून 3.92 लाख कोटींचे स्पेक्ट्रम लिलाव केला जाणार आहे. यामध्ये 5जी साठी आवश्यक फ्रिक्वेन्सी नाहीय, असे जाहीर केले आहे.

यामुळे आतापासूनच बाजारात 5जी मोबाईल येऊ लागले असल्याने ग्राहकांनीही त्याला मोठी पसंती दर्शविली होती. मात्र, या हौशी 5जी ग्राहकांना पुढील वर्षाची किंवा आणखी दोन वर्षे वाट पहावी लागण्याची शक्यता आहे.