Airtel Vs Jio 5G: एअरटेल की जिओ? कोणाचा 5G स्पीड, कव्हरेज सुपरफास्ट असणार; कोणाचे स्वस्त रिचार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 01:24 PM2022-10-09T13:24:39+5:302022-10-09T13:28:37+5:30

Airtel Vs Reliance Jio 5G Comparison: तुम्हाला फास्ट इंटरनेटही हवेय आणि रेंजही चांगली हवीय, नाहीतर हॅलो हॅलो करूनच दमलात तर...

एअरटेल आणि जिओ या दोन खासगी टेलिकॉम कंपन्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात निवडक शहरांत आपली ५जी सेवा लाँच केली आहे. या शहरांतील अनेकांना ५जी नेटवर्क येत नाहीय. यामुळे ते त्रस्त आहेत. तर अनेकजण जिओ टू एअरटेल स्वीच देखील करण्याच्या विचारत आहेत. असे असले तरी जिओ घेऊ की एअरटेल, कोणाचे नेट फास्ट असणार, कोणाचे कव्हरेज चांगले असणार हे प्रश्न दुर्लक्षून चालणार नाहीय. कारण यावरच बरेचकाही अवलंबून आहे.

तुम्हाला फास्ट इंटरनेटही हवेय आणि रेंजही चांगली हवीय, नाहीतर इंटरनेट फास्ट आहे, या दाव्यावर तुम्ही ऑपरेटर बदलला किंवा नवे सिम घेतले तर बोलताना आवाज येत नाहीय, आवाज येत नाहीय असे होऊ लागले तर काय कराल? त्रस्त व्हाल ना. जेव्हा पोर्ट करण्याची सुविधा आली तेव्हा अनेकांनी याच कारणाने कंपन्या बदलल्या आहेत. रिचार्जचे काय दोन चार रुपयांचा फरक असायचा. पण आजही अनेकांना फोनवर व्यवस्थित बोलणे होणे महत्वाचे आहे.

एअरटेल आणि जिओ खरेतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर काम करतात. तसेच दोन्ही कंपन्या वेगवेगळे बँड वापरतात. जिओकडे जो 700MHz चा स्पेक्ट्रम आहे, तो संथ म्हटला जातो. म्हणजेच तो बिल्डिंगच्या आरपारही व्यवस्थित रेंज उपलब्ध करेल. जिओकडे 3300-3600MHz हा बँडही आहे, जो महागडा आहे. या दोन्ही बँडमुळे शहर आणि गाव आदी भाग नीट कव्हर होऊ शकणार आहेत. विशेषत: जिओ दाटीवाटीच्या भागात जिथे भिंतीला भिंती चिकटलेल्या आहेत. मोठी गर्दी आहे तिथे जिओची रेंज चांगली मिळणार आहे. यामुळे जिओला भविष्यात ४जीची गरज लागणार नाही.

एअरटेलचे तसे नाहीय, एअरटेलने जे बँड घेतले आहेत, ते जास्त फ्रिक्वेन्सीचे आहेत. यामुळे एअरटेलने जिओपेक्षा कितीतरी पैसा खर्च केला आहे. हे हाय फ्रिक्वेन्सी बँड असल्याने त्यांची रेंजही कमीच असणार आहे. यामुळे ते दाटीवाटीच्या शहरांत जास्त परिणामकारक काम करू शकत नाहीत. यासाठी एअरटेलला एकतर जवळजवळ टॉवर उभारावे लागतील किंवा त्यांना ४जीची सेवा देखील वापरावी लागेल. यामुळे एअरटेलचे प्लॅन जिओपेक्षा पर्यायाने महाग किंवा कमी ऑफरचे जसे की किंमत तेवढीच परंतू कमी डेटा आदीचे असू शकतात. तसेच कॉल ड्रॉपची समस्यादेखील जाणवू शकते.

आता जरी दोन्ही नेटवर्क वापरणाऱ्यांकडून स्पीड जास्त असल्याचे सांगितले जात असले तरी हे सगळे युजर काही हजारांत लाखात आहेत. अद्याप फुल फोर्सने युजरही झालेले नाहीत आणि नेटवर्कही कार्यन्वित झालेले नाही. यासर्व गोष्टी त्या त्या भागातील बँड, युजरची संख्या तेथील भौगोलिक परिस्थिती, दाटीवाटी, इमारती आदींवर अवलंबून आहेत. यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्कचे खरे रुप त्यांनी रिचार्ज प्लॅन्स जाहीर केले कीच समोर येणार आहे. सध्यातरी दोन्ही कंपन्यांचे ग्राहक ५जीची वाट पाहत आहेत.