सॅल्यूट! नौदलाच्या नारीशक्तीची कमाल; आव्हानांवर मात करत ८ महिन्यांत जगाला घातली प्रदक्षिणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:47 IST2025-05-30T14:34:47+5:302025-05-30T14:47:35+5:30

भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी इतिहास रचला आहे.

भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी इतिहास रचला आहे. 'नाविका सागर परिक्रमा II' मोहिमेअंतर्गत जगाला प्रदक्षिणा घातली आहे. मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के आयएनएस तारिनीमार्गे गोव्याच्या किनाऱ्यावर परतल्या.

या अभिमानास्पद क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही महिला अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला आणि या अनोख्या साहसी मोहिमेच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं.

ही ऐतिहासिक मोहीम २ ऑक्टोबर २०२४ रोजी गोव्यातील नेव्हल ओशन सेलिंग नोड येथून सुरू झाली. ही प्रदक्षिणा विशेष महत्त्वाची होती कारण ती 'डबल-हैंडेड मोड' ने पूर्ण झाली, म्हणजेच ही संपूर्ण अवघड मोहीम कोणत्याही अतिरिक्त क्रूच्या मदतीशिवाय केवळ दोन महिला अधिकाऱ्यांनीच एकत्रितपणे पूर्ण केली.

हे केवळ शारीरिक क्षमतेने नाही तर मानसिक बळ, नौदल कौशल्य आणि अढळ आत्मविश्वासामुळे शक्य झालं आहे. राजनाथ सिंह यांनी दोन महिला अधिकाऱ्यांचं भरभरून कौतुक करत सन्मान केला आहे.

‘आयएनएस तारिनी’वर जगातील प्रमुख महासागर, समुदातील कठीण परिस्थिती, वादळ आणि हजारो मैलांचा प्रवास पार करून दोन्ही महिला नौदल अधिकारी गोव्यात परतल्या आहेत.

या अवघड काळात अधिकाऱ्यांनी केवळ तांत्रिक आणि धोरणात्मक आव्हानांना तोंड दिलं नाही तर जागतिक व्यासपीठावर भारतीय महिला शक्तीची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. जगाला दाखवून दिलं आहे.

"ही परिक्रमा भारताच्या लेकींची इच्छाशक्ती आणि धैर्याची साक्ष आहे. लेफ्टनंट कमांडर रूपा आणि दिलना यांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय महिला समुद्राच्या विशालतेपेक्षा मोठ्या आहेत" असं म्हणत राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

नौदलाच्या या प्रयत्नाचे वर्णन राजनाथ सिंह यांनी महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबी भारताच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल म्हणून केलं.

नाविका सागर परिक्रमा II हा भारतीय नौदलाचा एक उपक्रम आहे जो महिला अधिकाऱ्यांना नेतृत्वासाठी तयार करतो आणि त्यांना सागरी ऑपरेशन्सच्या सर्वात आव्हानात्मक स्वरूपाची ओळख करून देतो. या मोहिमेने दाखवून दिलं आहे की महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, मग ते जमीन असो वा समुद्र.

या मोहिमेच्या यशाने प्रेरित होऊन भारतीय नौदल भविष्यात अशा आव्हानात्मक भूमिकांमध्ये अधिकाधिक महिला अधिकाऱ्यांना संधी देण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 'तारिणी'चे हे पुनरागमन भारताच्या सागरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाणार आहे.