मध्यरात्रीपर्यंत जागेच असता- झोपच येत नाही? ५ पदार्थ खा- अंथरुणावर पडताच शांत झोप लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2025 11:50 IST2025-12-13T11:35:47+5:302025-12-13T11:50:04+5:30

हल्ली झोप न येण्याचा त्रास खूप वाढला आहे. खूप लोकांना रात्री शांत झोप येतच नाही. अंथरुणावर कितीतरी वेळ नुसतंच पडून राहिलं तरी डोळा लागत नाही. झोप लागली तर लगेच झोपमोड होते. त्यामुळे पुरेशी झोप होऊन आराम मिळत नाही.

हे टाळण्यासाठी काही पदार्थ आवर्जून तुमच्या आहारात असायला पाहिजेत. कारण त्या पदार्थांमध्ये असणारे काही घटक शांत झोप येण्यासाठी मदत करतात. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी urmilanimbalkar and jagtapclinicresearchcentrepune या पेजवर शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी सांगितलेला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे हळदीचं दूध. हळदीच्या दुधात काही संप्रेरके असतात ज्यामुळे शांत झोप येण्यास मदत होते. त्यामुळे निद्रानाशाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी रात्री झोपण्यापुर्वी हळदीचं दूध पिऊन झोपावं.

ज्यांना शांत झोप येत नाही त्यांनी त्यांच्या आहारात काही दिवस नियमितपणे बदाम घ्यावेत. रात्रभर पाण्यात भिजवलेल्या बदामाची सालं काढून टाकावीत आणि त्यानंतर ते बारीक चावून खावेत.

केळीमध्ये असणारे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम शांत झोप येण्यासाठी मदत करतं. शिवाय शरीर निरोगी, सुदृढ ठेवण्यासाठीही केळी अतिशय फायदेशीर ठरते.

द्राक्ष, चेरी प्रकारच्या फळांमध्येही चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम असतं. त्यामुळे त्याचाही उपयोग शांत झोप येण्यासाठी होतो.

याशिवाय जायफळामध्येही काही घटक असतात जे झोप येण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जायफळं घातलेलं दूध रात्री झोपण्यापुर्वी घेतलं तरी चालेल.

यासोबतच रात्री झोपण्यापुर्वी पचायला जड असणारं अन्न तसेच तेलकट, तुपकट पदार्थ खाणंही टाळावं. त्याचाही झोपेवर वाईट परिणाम होतो.

















