Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:29 PM2021-07-23T13:29:56+5:302021-07-23T13:37:51+5:30

Ratnagiri, Chiplun, Raigad Flood: गेल्या २ दिवसांपासून कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. शहर बाजारपेठा पाण्याखाली बुडाल्या आहेत.

कोकणात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे कोकणातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे. अतिवृष्टीचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना बसला आहे. याठिकाणी काजळी नदीला पूर आल्यानं चांदेराई, तोणदे येथील अनेक गावांच्या घरात पाणी शिरले आहे.(Chiplun Flood)

बुधवारी रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे चांदेराई गावाला यावर्षीही पुराचा फटका बसला आहे. रात्रीच्या वेळेस पाणी भरल्यानं बाजारपेठेतील १०० दुकानदारांची तारांबळ झाली. शहर आणि तालुक्याती अनेक गावात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. (Ratnagiri Flood)

समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने शहरानजिकच्या पंधरामाड-कांबळेवाडी परिसरातील सुमारे पंधरा फुटापेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. यामुळे या पावसाळ्यातदेखील मिऱ्यावासीयांची भीती कायम आहे.

पूर परिस्थितीत मदतीसाठी संपूर्ण यंत्रणा उतरली. नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात आहेत. स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.(Indian Airforce)

किनाऱ्यालगतचा रस्ता देखील वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. यावर तत्काळ उपाययोजना न केल्यास येथील ग्रामस्थांना समुद्रापासून धोका निर्माण होणार आहे. भारतीय हवाई दलानं रेस्क्यू ऑपरेशन करताना ही भयानक दृश्य कॅमेऱ्यात टीपली आहे.

राजापूर शहर आणि तालुक्यात गेल्या बारा दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने बुधवारपासून रौद्ररूप धारण केले. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्याने पुराच्या पाण्याचे राजापूर शहरात शिरले आहे.

पूरस्थितीमुळे ग्रामीण भागातील एस.टी. फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. अर्जुना नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अर्जुना नदीवरील वरचीपेठ येथील ब्रिटिशकालीन पूल गुरुवारी दुपारी साडेबारा वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.(NDRF)

सततच्या पुराचा सर्वाधिक फटका शहर बाजारपेठेला बसला आहे. या हंगामात तब्बल सहा वेळा पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेत शिरकाव केला. बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारी पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत शिरकाव केला.

पुराच्या पाण्याने यावेळी जवाहर चौक मार्गे कुशे मेडिकल, नवाळे कॉम्प्लेक्सपर्यंत, तर बाजारपेठेत अभ्यंकर ग्राहक बाजार व मुन्शीनाका मार्गे उर्दू शाळेपर्यंत धडक मारली, तर मालपेकर रोड पाण्याखाली गेला आहे.

मात्र, नगरपरिषदेने पुराचा धोका लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन केल्याने सर्वांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. मात्र, बाजारपेठेत पाणी शिरल्याने बहुतांशी दुकाने बंद राहिली आहेत.

राज्य आणि केंद्र सरकार पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकांना सुरक्षितस्थळी नेऊन त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.

Read in English