२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:38 IST2025-07-19T13:35:45+5:302025-07-19T13:38:52+5:30

अंमलबजावणी संचालनालयात (ED) काम करताना दोन मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले दिग्गज अधिकारी कपिल राज यांनी राजीनामा दिला आहे. सुमारे १६ वर्षे सरकारमध्ये काम केल्यानंतर ४५ वर्षीय भारतीय महसूल सेवा (आयआरएस) अधिकारी कपिल राज यांनी राजीनामा दिला.
२००९ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी कपिल राज यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) आठ वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन मुख्यमंत्र्यांनाही अटक केली. कपिल राज यांनी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारख्या प्रकरणांची चौकशी देखील केली.
कपिल राज यांनी १७ जुलैपासून भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) पदाचा राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा १७ जुलैपासून स्वीकारला गेला असं त्यानंतर अर्थ मंत्रालयाने सांगितले. भारताच्या राष्ट्रपतींनी १७ जुलैपासून भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर) पदाचा राजीनामा स्वीकारला आहे असं आदेशात म्हटले आहे.
६० वर्षांच्या निवृत्तीचे वय लक्षात घेता कपिल राज यांची सेवा अजून सुमारे १५ वर्षे शिल्लक होती. तरीही कपिल राज यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला.कपिल राज हे ईडीचे माजी अधिकारी आहेत. त्यांनी दोन मुख्यमंत्र्यांना अटक केली होती त्यामुळे प्रसिद्धीझोतात आले होते. कपिल राज यांनी मनी लाँड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत या मुख्यमंत्र्यांना अटक केली होती.
कपिल राज यांनी सुमारे आठ वर्षे अंमलबजावणी संचालनालयात काम केले. अलीकडेच त्यांनी संघीय मनी लाँड्रिंग विरोधी संस्थेत त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ पूर्ण केला. राजीनामा देण्यापूर्वी ते दिल्लीतील जीएसटी इंटेलिजेंस विंगमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्त होते.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक पदवी असलेले कपिल राज हे मूळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील आहेत. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचे त्यांनी नेतृत्व केले होते. हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती
पीटीआयच्या वृत्तानुसार, हेमंत सोरेन यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली आणि ईडीने ताब्यात घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. कपिल राज त्या बैठकीला उपस्थित होते, त्यानंतर लगेचच त्यांच्या पथकाने सोरेन यांना ताब्यात घेतले.
यानंतर मार्चमध्ये कपिल राज दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले. ईडीने केजरीवाल यांच्या अधिकृत बंगल्यावर छापे टाकले होते. २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. केजरीवाल यांना अटक मेमो देण्यात आला तेव्हा कपिल राज उपस्थित होते.
कपिल राज या हाय-प्रोफाइल राजकीय आरोपींसाठी प्रश्नांची यादी बनवत असत. तपास जवळून पाहण्यासाठी ते अनेक वेळा सर्च होणाऱ्या ठिकाणी जात असत. यामुळे त्यांच्या टीमचे मनोबल वाढत होते.
यापूर्वी मुंबईत पोस्टिंग असताना कपिल राज यांनी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी सारख्या हिरे व्यापाऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणांची चौकशी केली होती. याशिवाय त्यांनी डीएचएफएल आणि इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणांचीही चौकशी केली. डीएचएफएल ही एक आर्थिक कंपनी होती. इक्बाल मिर्ची हा एक गँगस्टर होता.