इशारा! रात्रीचं आकाश गायब होणार, सध्या तारेही जास्त दिसत नाहीत; वैज्ञानिकांनी सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 04:37 PM2023-01-21T16:37:34+5:302023-01-21T16:42:23+5:30

काही वर्षांनी रात्रीचे आकाश आपल्या सर्वांना दिसणे बंद होईल. २०११ ते २०२२ या काळात रात्रीच्या आकाशाची चमक ७ ते १० टक्क्यांनी कमी झाली आहे. म्हणजेच जमिनीवर प्रकाश देणारे मानवनिर्मित दिवे आकाशाला धूसर करत आहेत. जगभरात केलेल्या अभ्यासातून हा खुलासा समोर आला आहे.

हळूहळू रात्रीचे आकाश त्याचे सौंदर्य गमावत आहे. याचे कारण प्रकाश प्रदूषण(Light Pollutions) आहे. संपूर्ण जग प्रकाशित करण्याच्या नादात आपण आपले स्वतःचे आकाश गमावू लागलोय. कारण पृथ्वीवर सतत वाढत असलेल्या प्रकाश प्रदूषणामुळे तुमचे डोळे आणि आकाश यांच्यातील प्रकाशाचे परावर्तन खूप जास्त होत आहे.

त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आकाश अंधुक दिसते. तारे दिसत नाहीत. आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांची संख्या कमी होत आहे. या गोष्टीच्या अभ्यासासाठी उत्तर अमेरिका, युरोप, आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका या देशांची निवड करण्यात आली.

जगभरातील १९ हजार ठिकाणांहून २९ हजार लोकांना विचारण्यात आले की, तुम्हाला रात्रीचे आकाश स्पष्ट दिसत आहे का? गेल्या दशकापासून आतापर्यंत किती बदल झाला आहे. त्यामुळे जगभरातील नागरिक शास्त्रज्ञांनी त्यांचे उत्तर पाठवले.

त्यानंतर प्रकाश प्रदूषणाचा हा अहवाल तयार करण्यात आला. ज्यामध्ये गेल्या दशकात पृथ्वीवरील प्रकाश प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रात्रीचं स्पष्टपणे आकाश दिसणे ७ ते १० टक्क्यांनी कमी झालं आहे.

सध्याची परिस्थिती अशी आहे की, जर तुम्ही कमी प्रदूषण असलेल्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला आकाशात अनेक तारे दिसतात. पण तुम्ही शहरात जाताच ते कमी होतात. खरे तर ते कमी नसतात. हवा आणि प्रकाश प्रदूषणामुळे तुम्हाला कमी दिसू लागते.

मानवाने निर्माण केलेल्या प्रकाशामुळे, प्रकाशाचे परावर्तन पृथ्वीभोवती इतके होत आहे की आकाशातील तारे अस्पष्ट होणे किंवा आपल्या डोळ्यांना ते दिसेनासे झाले आहेत. GFZ जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसचे भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्टोफर कीबा म्हणाले की हा अभ्यास दोन गोष्टींमुळे महत्त्वाचा आहे.

पहिला म्हणजे रात्रीच्या आकाशाच्या ब्राइटनेसचा जागतिक स्तरावर प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे. दुसरे म्हणजे, रात्रीचा प्रकाश कमी करण्यासाठी बनवलेले नियम जगभर धुडकावले जात आहेत. विकासाच्या नावाखाली ज्याप्रकारे मानवनिर्मित प्रकाशझोत वाढत आहे, तो नैसर्गिक देखाव्यासाठी धोकादायक ठरत आहे.

कीबा सांगतात की, गेल्या दशकात वाढत्या कृत्रिम प्रकाशामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांवर खूप अभ्यास केला जात आहे. यासाठी जगभर नियम बनवले जात आहेत. वातावरणातील प्रकाशाच्या प्रमाणात चर्चा केली जात आहे, जेणेकरून आपल्याला आपले आकाश स्पष्टपणे पाहता येईल.

पण जितक्या वेगाने कृत्रिम प्रकाश वाढत आहे. हा विकास नसून प्रदूषण आहे. सन २०१७ मध्ये उपग्रहांच्या मदतीने केलेल्या अभ्यासानुसार, मानवाने तयार केलेला प्रकाश त्या भागाची चमक दरवर्षी २ टक्क्यांनी वाढवत आहे.

आधुनिक एलईडी दिव्यांमुळे ही समस्या झपाट्याने वाढत आहे. आता अजून काही वर्षे लागतील. त्यानंतर रात्रीच्या आकाशाचे सौंदर्य बघायला मिळणार नाही. सर्वात मोठी समस्या उपग्रहांची आहे. कारण इतक्या प्रकाशामुळे त्यांना पृथ्वीवर लक्ष ठेवणे कठीण होते. प्रकाशाच्या परावर्तनामुळे त्यांचे सिग्नल आणि कॅमेरे प्रभावित होतात. यामुळे डेटामध्ये फरक पडतो.

प्रकाश प्रदूषणाचा परिणाम केवळ आकाश आणि अंधारावर होत नाही. त्याचा परिणाम मानव आणि प्राण्यांवरही होतो. अनेक प्रजाती नामशेष होत आहेत. प्राण्यांचं जीवनचक्र बदलत आहे. प्रकाश प्रदूषण कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे प्रकाश उपकरणांची दिशा, प्रमाण आणि प्रकार सुधारणे असं आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.