भारतीय लष्कराने विकसित केले सिक्रेट स्वदेशी व्हॉट्सअ‍ॅप, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By बाळकृष्ण परब | Published: March 1, 2021 05:10 PM2021-03-01T17:10:38+5:302021-03-01T17:26:36+5:30

Secret Indigenous WhatsApp, developed by the Indian Army : भारतीय लष्कराने आपल्या वापरासाठी एक मेसेजिंग फ्लॅटफॉर्म विकसित केला आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराकडून या अ‍ॅपचा वापर १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल सारख्या व्यावसायिक अ‍ॅपच्या तोडीस तोड विकसित करण्यात आले आहे.

भारतीय लष्कराने आपल्या वापरासाठी एक मेसेजिंग फ्लॅटफॉर्म विकसित केला आहे. त्याचे नाव सिक्योर अ‍ॅप्लिकेशन फॉर इंटरनेट म्हणजेच SAI असे आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराकडून या अ‍ॅपचा वापर १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, सिग्नल सारख्या व्यावसायिक अ‍ॅपच्या तोडीस तोड विकसित करण्यात आले आहे.

या अ‍ॅपमध्ये एंड टू एंड व्हाइस, टेक्स्ट आणि व्हिडीओ कॉलिंग सुविधा ही इतर अ‍ॅपप्रमाणेच असतील. मात्र लष्करासाठी विकसित करण्यात आलेल्या या अ‍ॅपमध्ये इतरही काही वैशिष्ट्ये आहेत.

संरक्षण मंत्रालयाने ऑक्टोबर २०२० मध्ये SAI अ‍ॅपच्या माध्यमातून घोषणा करताना सांगितले होते की, या अँड्रॉइड अ‍ॅपमध्ये सिक्युरिटी फिचर वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हे अ‍ॅप लोकल इन हाऊस सर्व्हर आणि कोड्सवर आधारित आहे. त्यांना आवश्यकतेनुसार बदलता किंवा रद्द करता येऊ शकते. या अ‍ॅपचे पुनरिक्षण आर्मीचे सायबर ग्रुप आणि सीईआरटी-आयएन च्या ऑडिटरने केले आहे. सध्या इंटेलेक्चुअर प्रॉपर्टी राइट्ससाठी फाइल करण्यात आले आहे.

या अ‍ॅपचा वापर लष्कराच्या अंतर्गतच होणार आहे. जेणेकरून त्याचा सुरक्षित वापर करता येईल. सध्या या अ‍ॅपचे आयओएस डेव्हलपमेंटचे काम चालू आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे लष्करासाठी हे अ‍ॅप विकसित करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव कर्नल साई शंकर आहे. सध्या ते या अ‍ॅपसाठी सायबर आणि सिक्युरिटी क्लिअरन्स आणि डेटा टेस्टिंगमध्ये गुंतलेले आहेत. हे अ‍ॅप विकसित करणाऱ्यांनी हे अ‍ॅप वॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम आणि सिग्नलसारख्या अ‍ॅपच्या समान फिचर्ससाठी सुरक्षित पर्याय असल्याचे सांगितले आहे.

गतवर्षी जून महिन्यात भारत आणि चीनमधील तणाव खूप वाढला होता. तेव्हा भारताने ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. जुलैमध्ये भारतीय लष्कराने जवानांना डेली हंट, टिंडर, फेसबूक, टिकटॉक, झूम, पब्जीसह सुमारे ८९ अ‍ॅप्स आपल्या मोबाइलमधून हटवण्याचे आदेश दिले होते. तसेच जवानांना व्हॉट्सअ‍ॅपचा अधिकृतरीत्या वापर न करण्याचा सल्ला दिला होता. एवढेच नव्हे तर भारताच्या सशस्त्र दलांच्या बेस आणि डॉकायर्डमध्ये स्मार्टफोनच्या वापरावरही बंदी घालण्यात आली होती.

बॉयकॉट चायना मोहिमेमुळे भारतामध्ये आत्मनिर्भर भारत किंवा स्वदेशी मोहिमेने जोर पकडला आङे. या कार्यक्रमांतर्गत भारतीय लष्कराने SAI विकसित केले तर राष्ट्रीय माहिती केंद्राने Samdes आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमेटिक्सने SAMWAD सारखे अ‍ॅप विकसित केले. ही स्वदेशी मोहिमेसाठी हे उपयुक्त पाऊल असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर तांत्रिक आणि डेटाच्या दृष्टीनेहीहे अॅप अधिक सुरक्षित आहे. मात्र एक फॅक्ट हासुद्धा आहे की SAI अॅपने आपल्या ट्रायल पूर्ण केल्या आहेत.

अ‍ॅपच्या बाबतीत एका लष्करी अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या एका वृत्तात सांगितले की, SAI मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. आता या अ‍ॅपला इतर सरकारी विभागांमध्ये वापरासाठी विचार करण्यात येणार आहे. सध्या या अ‍ॅपचे सध्या १८ हजार युझर आहेत. मात्र हे सार्वजनिक अ‍ॅप नाही आहे. भविष्यात या अ‍ॅपकडे व्हॉट्सअ‍ॅपचा स्वदेशी पर्याय म्हणून पाहिले जात आहे.