लॉकडाऊनमध्ये मुलाला १४०० किमी स्कूटरवर जाऊन आणलेले; तो आता युक्रेनमध्ये अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 01:29 PM2022-03-04T13:29:14+5:302022-03-04T13:38:14+5:30

तुम्हाला रझिया बेगम हे नाव तर लक्षात असेल. पहिल्या लॉकडाऊनमध्ये स्कूटीवरुन तब्बल १४०० किलोमीटरपर्यंतचा प्रवास करून आपल्या मुलाला घरी आणलं होतं.

निजामुद्दीन नेल्लोरला असताना इंटरमिजिएटला होता. डॉक्टर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो युक्रेनला गेला. तेथे तो एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून आहेत. या परिस्थितीत रझिया बेगम आपल्या मुलासाठी प्रार्थना करत आहेत.

रझिया यांचा मुलगा युक्रेनमधील सुमी येथे शिक्षणासाठी गेला आहे. सुमी हे रशियाच्या सीमेजवळ आहे. बहुतांश भारतीय विद्यार्थी सुमी स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेत आहेत.

रझिया यांचा मुलगा निझामुद्दीन हा सध्या युक्रेनमध्येच आहे. तसंच तो एका बंकरमध्ये राहत असून आपल्या आईशी फोनवरून संपर्क साधत आहे.

मला मुलानं एक फोन कॉल केला होता. सर्वकाही ठीक आहे आणि मला त्याच्याबाबत चिंता करण्याची कोणतीही गरज नाही, असं त्यानं सांगितल्याचं रझिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

रिपोर्टनुसार निझामुद्दीन अमन सध्या ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हीटी नाही.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. पोलंड, रोमानिया आणि हंगेरीच्या मार्गे भारतीय नागरिकांना आणलं जात आहे. आपलाही मुलगा लवकरच परतेल अशी आशा त्या व्यक्त करत आहेत.

तेलंगणमधील निझामाबाद येथे राहणाऱ्या रझिया दोन वर्षांपूर्वी चर्चेत आल्या होत्या. त्यावेळी कोरोनामुळे पहिला लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यावेळी रझिया या निझामाबादमध्ये होत्या आणि त्यांचा मुलगा आंध्रातील नेल्लोरमध्ये होता.

त्यावेळी लॉकडाऊन दरम्यान, त्याला परतण्याचा कोणताही मार्ग नसल्यामुळे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी पोलिसांकडून लेटर घेऊन आपल्या स्कूटीवरून मुलाला परत आणण्यासाठी निघाल्या. एप्रिलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी १४०० किलोमीटरचा प्रवास केला आणि आपल्या मुलाला घरी आणलं.

आता त्यांचा मुलगा युक्रेनमध्ये अडकला आणि रझिया बेगम यांच्याकडे सध्या त्याला परत आणण्यासाठी कोणताही मार्ग नाही. पहिल्याप्रमाणे त्या त्याला परत आणण्यासाठी जाऊदेखील शकत नाहीत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडे आपल्या मुलाला सुखरुप परत आणण्यासाठी मदत मागितली आहे.