अरे व्वा! शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतील 36 हजार; महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये; जाणून घ्या 'ही' जबरदस्त योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:14 PM2021-05-07T18:14:13+5:302021-05-07T18:29:23+5:30

Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana : शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाकाठी पेन्शन म्हणून 36000 रुपये मिळवू शकतात. या योजनेचा कसा आणि कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल, त्याचा सहजपणे कसा लाभ घ्यावा हे जाणून घेऊया...

देशातील छोट्या शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या वतीने अनेक नवनवीन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना देखील त्याचा मोठा फायदा होत आहे. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दिले जात आहेत.

किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच सरकारची आणखी एक योजना देखील आहे. ज्याअंतर्गत शेतकरी दरवर्षी तब्बल 36000 हजार रुपये मिळवू शकतात. प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana) असं या योजनेचं नाव आहे.

शेतकरी या योजनेअंतर्गत वर्षाकाठी पेन्शन म्हणून 36000 रुपये मिळवू शकतात. या योजनेचा कसा आणि कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळू शकेल, त्याचा सहजपणे कसा लाभ घ्यावा हे जाणून घेऊया...

पंतप्रधान किसान मानधन योजना पंतप्रधान किसान पेन्शन योजना म्हणूनही ओळखली जाते. केंद्र सरकारने 31 मे 2019 रोजी ही योजना सुरू केली होती. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ही योजना सुरू केली आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्याला वयाच्या 60 व्या वर्षानंतर प्रत्येक महिन्याला 3000 रुपये म्हणजेच वार्षिक 36000 रुपये पेन्शन म्हणून दिले जाणार आहेत.

18 ते 40 वर्षे वयोगटातील आणि अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ज्यांची 2 हेक्टर किंवा त्याहून कमी शेतजमीन आहे.

आधार कार्ड, ओळखपत्र, वयाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शेताचा सातबाराचा उतारा, बँक खात्याचे पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी गोष्टी या अत्यंत आवश्यक आहेत.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी CSC) वर जाऊन नोंदणी करता येईल. आपण स्वतःही यासाठी नोंदणी देखील करू शकतो. सर्व कागदपत्रे नोंदणीच्या वेळी जवळ ठेवावी लागतील.

सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाईट (maandhan.in) वर जावे लागेल. वेबसाईटवर जाऊन लॉग इन करण्यासाठी (maandhan.in/auth/login), पेजवर दिसणाऱ्या क्लिक हिअर टू अप्लाय या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

लॉगिन दरम्यान, अर्जदारास त्याचा फोन नंबर टाकावा लागेल. याशिवाय नाव, पत्ता, मोबाइल नंबर, कॅप्चा कोड इत्यादी मागितली जाणारी इतर माहिती भरावी लागेल. यानंतर जनरेट ओटीपीवर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.

ओटीपी टाकल्यावर एक अर्ज आपल्यासमोर येईल. या अर्जामध्ये विचारण्यात आलेली माहिती भरून सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंटआउट काढता येईल. जेणेकरून येणाऱ्या काळात केव्हाही सहज वापर करता येईल.

किसान निवृत्तीवेतन योजनेतील नियमांनुसार, जर एखादा शेतकरी (ज्याची 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन शेती आहे) 18 वर्षे वयाचा असेल तर, त्याला दरमहा 55 रुपये किंवा वर्षाकाठी 660 रुपये जमा करावे लागतील. त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर त्याला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल.

सरकारने सर्व वयोगटातील शेतकऱ्यांसाठी निश्चित केलेली रक्कम दरमहा आणि वार्षिक जमा करावी. म्हणजेच, जर आपण 25 वर्षांचे असाल तर आपल्याला या योजनेंतर्गत किती पैसे जमा करावे लागतील, याबद्दल योजनेत माहिती दिली गेली आहे. विशेष म्हणजे आपण या योजनेत जेवढे पैसे जमा कराल, तितकेच सरकारही जमा करेल.

जर लाभार्थ्याने योजना मध्येच सोडली किंवा पैसे जमा करणे थांबवले तर, तोपर्यंत जमा केलेले पैसे सुरक्षित असतील. जमा केलेल्या रकमेवर, बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाइतकी रक्कम व्याज म्हणून मिळेल.

जर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा काही कारणांमुळो मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळत राहील. अधिकृत वेबसाईटवर या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.