सर्जिकल स्ट्राइकसारखं सीक्रेट प्लानिंग, शाह-डोवाल यांचं 'मॉनिटरिंग'...अशी झाली PFI वर धडक कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:49 AM2022-09-23T09:49:17+5:302022-09-23T10:00:09+5:30

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (PFI) गुरुवारी १५ राज्यांमध्ये NIA नं छापेमारी केली. यात जवळपास देशभरात १५० ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले गेले आणि १०६ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या ऑपरेशनच्या प्लानिंगपासून ते पूर्णत्वास जाईपर्यंत गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली झालं आहे.

सप्टेंबरचा महिना, दोन तारीख आणि पंतप्रधान मोदी INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलाला सोपवण्यासाठी केरळच्या कोच्चीमध्ये होते. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी NSA अजित डोवाल देखील तिथं उपस्थित होते. डोवालांचं लक्ष पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे तर होतंच पण त्यांची एक टीम दुसऱ्याच एका मिशनवर काम करत होती. या मिशनबाबतही डोवाल यांच्या मनाची चलबिचल सुरू होती. हे काम होतं पीएफआयचं देशभरातील संपूर्ण नेटवर्क उखडून टाकण्याचं.

पीएफआय विरोधातील मिशनसाठी डोवाल यांनी केरळ पोलीस अधिकाऱ्यांसोबत डोवाल यांनी बैठक देखील घेतली. डोवाल यांनी केरळ पोलिसांना संपूर्ण प्लानची माहिती दिली. त्यानंतर डोवाल थेट मुंबईला पोहोचले. लाइमलाइटपासून दूर राहात डोवाल यांनी राज्यपाल भवनात सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या संपूर्ण मिशनमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या ऑपरेशन आणि जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलेल्या निर्णयासारखीच गुप्तता बाळगण्यात आली. यासाठी तीन-चार महिन्यांआधी देशातील प्रमुख इस्लामिक नेत्यांचीही भेट घेतली होती.

२२ सप्टेंबर २०२२. एनआयएच्या तब्बल २०० अधिकाऱ्यांनी देशभरात पीएफआयशी निगडीत ठिकाणांवर छापेमारी केली. यात शंभरहून अधिक जणांना टेरर फंडिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. अतिशय सीक्रेट पद्धतीनं या प्लानची आखणी करण्यात आली होती आणि एकाचवेळी तब्बल १५ राज्यांमध्ये १५० ठिकाणी छापा टाकला. तर दिल्लीत पीएफआयचा प्रमुख परवेज अहमद यालाही अटक करण्यात आली.

हे ऑपरेशन मध्यरात्री उशिरा १ वाजता सुरू झालं होतं. ऑपरेशनमध्ये ४ आयजी, १ एडीजी आणि १६ एसपी रँक अधिकाऱ्यांचा समावेश होता. संपूर्ण छापेमारीमध्ये १५० मोबाइल आणि ५० लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या पीएफआय नेता आणि कार्यकर्त्यांना कोर्टात लगेच हजरही करण्यात आलं. पटियाला हाऊस कोर्टानं त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण ऑपरेशन गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या देखरेखीखाली झालं आणि त्यांनीच याचं संपूर्ण प्लानिंग केलं होतं. अमित शाह यांच्या सांगण्यानुसार संपूर्ण प्लान टॉप सीक्रेट ठेवण्यात आला होता. इतकंच नव्हे, तर तपास अधिकाऱ्यांच्या प्रवासासाठी विमान सर्व राज्यांमध्ये सज्ज ठेवण्यात आलं होतं. जेणेकरुन पीएफआयशी निगडीत लोकांना एअरक्राफ्ट करुन तातडीनं वेगवेगळ्या लोकेशनवर घेऊन जाता येईल

पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाईमागे अनेक खास गोष्टी आहेत. सर्व ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली होती. तसंच एवढ्या मोठ्या ऑपरेशनला अगदी शांतपूर्ण पद्धतीनं पार पाडण्यात आलं. कोणत्याही हिंसक कारवाईची गरज पडली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार येणाऱ्या काळात आणखी काही टेरर ग्रूप्स सरकारच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे प्राप्त झाल्यानंतर तातडीनं कारवाई केली जाणार आहे.

एनआयच्या कारवाईविरोधात काही ठिकाणी आवाज देखील उठवला जात आहे. केरळमध्ये मलप्पुरममध्ये करण्यात आलेल्या करवाईवेळी पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. तसंच राजस्थानमध्ये पीएफआयशी निगडीत संशयित कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर जयपूरमध्येही गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. तर कोटामध्ये पीएफआयच्या समर्थनार्थ मुस्लिम संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली.