CoronaVirus News: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर फटका; मोदी सरकार मोठ्या घोषणा करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 04:52 PM2021-05-25T16:52:37+5:302021-05-25T16:56:17+5:30

CoronaVirus News: कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी यामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालंय

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण काहीसा कमी झाला आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा २ लाखांच्या खाली आला आहे. मृतांची संख्यादेखील कमी होत असल्यानं दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेला खूप मोठा फटका आहे. अनेक क्षेत्रांवर कोरोना संकटाचा परिणाम झाला. या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार लवकरच पॅकेज जाहीर करण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या क्षेत्रांना प्रोत्साहन पॅकेज देण्याची तयारी मोदी सरकारकडून सुरू आहे. स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा सामना कराव्या लागणाऱ्या उद्योगांना सशक्त करण्याचा उद्देश यामागे आहे.

लहान आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांसोबतच पर्यटन, उड्डाण आणि आदरातिथ्य क्षेत्राला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. या क्षेत्रांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकार पॅकेजवर काम करत असल्याचं वृत्त लाईव्ह मिंटनं दिलं आहे.

आर्थिक पॅकेज देण्याबद्दलची चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. त्यामुळे घोषणा नेमकी कधी होणार, याबद्दल कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नसल्याचं मिंटनं वृत्तात म्हटलं आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मोदी सरकारनं राष्ट्रव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली नाही. मात्र स्थानिक पातळीवर लॉकडाऊनचे निर्णय घेण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारांनी स्थानिक पातळ्यांवर लॉकडाऊनबद्दलचे निर्णय घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूसारखी औद्योगिकरणात अग्रेसर असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू झाल्याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला.

मिंटनं दिलेल्या वृत्तावर अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून सावरण्यासाठी मोदी सरकारनं पॅकेजची घोषणा केली होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अतिशय भीषण होती. त्यामुळे आता सरकार कोणत्या घोषणा करतं याकडे लक्ष लागलं आहे.