Taj Mahal Controversy: ताजमहाल मकबरा आहे की मंदिर? ‘त्या’ २२ खोल्यांमध्ये दडलंय रहस्य; इतिहासकार म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 05:23 PM2022-05-10T17:23:32+5:302022-05-10T17:29:47+5:30

Taj Mahal Controversy: ताजमहालची इमारत आधीच बांधलेली असावी आणि शाहजहानने ती बदलून घेतली असावी, अशी शक्यता इतिहासकार व्यक्त करतात.

जगातील सात आश्चर्यांपैकी एक भारतातील सर्वांत मनमोहक वास्तू म्हणजे ताजमहाल. ताजमहाल जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे. ताजमहालबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र, ताजमहाल हे हिंदूंचे तेजोमहालय असून, तेथे पूर्वी शिवमंदिर असल्याचा दावा केला जातो. (Taj Mahal Controversy)

ताजमहालात अशा २२ खोल्या आहेत, ज्यात मोठी रहस्ये दडलेली असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात एक याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ताजमहालचा वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. (Taj Mahal 22 Rooms Mystery)

इतिहासकार राजकिशोर यांच्या मते, ताजमहालातील त्या २२ खोल्या उघडल्या तर कळेल मंदिर होते की नाही? त्या २२ खोल्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या मंदिराच्या खुणा आढळल्या तर कळेल की, कधी काळी हे मंदिर होते, मकबरा नव्हता.

आणि जर काही चिन्ह दिसले नाही तर हा वाद कायमचा संपुष्टात येईल. त्यामुळे २२ खोल्या उघडल्या पाहिजेत. याचिकाकर्त्याने योग्य मागणी केली आहे, असे स्पष्ट मत राजकिशोर यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी ताजमहालच्या खाली बांधलेल्या २२ खोल्यांपर्यंत जाण्यासाठी मार्ग होता, मात्र ४५ वर्षांपूर्वी एएसआयने तो मार्ग बंद केला. त्या २२ खोल्यांमध्ये काय आहे? हे रहस्य अजून उलगडलेले नाही. राजकिशोर म्हणाले की, ताजमहालच्या या २२ खोल्या उघडल्यानंतर ताजमहालशी संबंधित सर्व रहस्ये बाहेर येतील.

ज्यावेळी ताजमहाल बांधला गेला त्यावेळी शाहजहान दक्षिण भारतात होता. त्याच्यासोबत मुमताजही होती. मुमताजचा बुरहानपूर येथे मृत्यू झाला. शाहजहानचा मुलगा सौजा मुमताजचा मृतदेह घेऊन आग्रा येथे आला. आधी मुमताजला ताजमहालच्या मुख्य इमारतीच्या आणि संग्रहालयाच्या मध्यभागी दफन करण्यात आले.

आणि ६ महिन्यांनंतर त्यांना ताजमहालच्या मुख्य समाधीमध्ये दफन करण्यात आले. इतिहासकार राजकिशोर यांनी प्रश्न उपस्थित केला की, एवढी मोठी इमारत बांधली जात असताना शहाजहान ताजमहालमध्ये का नव्हता?

ताजमहालची इमारत पूर्वी बांधली गेली असावी आणि शाहजहानने ती बदलून घेतली असावी, अशी शक्यता राजकिशोर यांनी व्यक्त केली आहे. ताजमहाल ज्या ठिकाणी आहे ती जयपूरचे राजा मानसिंग यांची मालमत्ता होती. शहाजहानने ताजमहालच्या बदल्यात मानसिंगचा नातू राजा जयसिंह याला चार इमारती दिल्या होत्या.

राजकिशोर शर्मा म्हणतात की त्यांच्याकडे एक फर्मान देखील आहे ज्यामध्ये ताजमहालच्या बांधकामासाठी संगमरवरी २३० बैलगाड्या आणल्या जातील असा उल्लेख आहे.

दरम्यान, ताजमहालात हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा भाजप प्रवक्त्याने आपल्या याचिकेत केला आहे. अयोध्येतील भाजप प्रवक्त्याने ही याचिका दाखल केली आहे. ASI ला ताजमहालमधील या २२ खोल्या बंद करण्याचे कारण काय आहे? असे विचारले असल्याचा दावा भाजप प्रवक्याने केला आहे.

याबाबत सांस्कृतिक मंत्रालयालाही विचारले की, खोल्या बंद ठेवण्याचं खरे कारण काय आहे? सुरक्षेच्या कारणास्तव या खोल्या बंद ठेवण्यात आल्याची माहिती मला देण्यात आली असल्याचे, भाजपच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

कोणाच्या आदेशाने ताजमहालातील खोल्या बंद करण्यात आल्या आहेत? यावर समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच ही याचिका दाखल केल्याची माहिती भाजप प्रवक्याने दिली.

ताजमहाल छोटी जागा नाही. या २२ खोल्या का बंद आहेत? याचे उत्तर मिळाले पाहिजे. या खोल्यांमुळे ताजमहालाबाबत अनेकदा वाद निर्माण होत असल्याचेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

जगातील सात आश्चर्यापैकी ताज महाल एक. पांढऱ्या शुभ्र संगमरवराने बांधलेली युमनेच्या तिरावर वसलेली ही इमारत पाहताच क्षणी मनात घर करते. देश-विदेशातून अनेक पर्यटक ताजमहालाचे सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात.

ताजमहालाला प्रेमाचे प्रतिक मानले जाते. ताजमहाल मुघल बादशाह शाहजहान यांचे आपली पत्नी मुमताजवर प्रेम होते. तिच्या निधनानंतर तिची आठवण म्हणून शाहजहान यांनी ताजमहाल बांधला. ही संगमरवरी इमारत उभारण्यास तब्बल २१ वर्षांचा अवधी लागला होता, असे इतिहास सांगतो.