भाज्यांचे दर गगनाला भिडले; लिंबू ३०० रुपयांच्या पुढे, सामान्यांसाठी राहिले फक्त कांदे, बटाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:40 PM2022-04-08T18:40:49+5:302022-04-08T18:52:22+5:30

गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. ही महागाई कार, घर, सिमेंट एवढ्यापुरती मर्यादित नाही.

भाजीपाल्यापासून ते इंधनापर्यंतच्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. ऐन उन्हाळ्यात लिंबाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याची किंमत ३०० ते ४०० रुपये किलोवर पोहोचली आहे.

अलीकडच्या काळात जिरे, धणे आणि मिरचीच्या दरात ४० ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर बीन्सचा भाव १२० रुपये किलोवर पोहोचला आहे. फ्लॉवरचा भाव आता ८० रुपये किलोवर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी फ्लॉवर ४० रुपये किलो दराने विकला जात होता.

किरकोळ बाजारात भेंडीचा दर १०० रुपये किलो, कारले १०० रुपये किलो, ढोबळी मिर्ची ७० रुपये किलोवर पोहोचली आहे. मात्र, बटाटे आणि कांद्याचे भाव अजूनही आटोक्यात असल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सध्या दरवाढ ही केवळ भाज्यांपुरतीच मर्यादित नाही. दूधाच्या किंमतीतही आता वाढ करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अमूल, मदर डेअरीचं दूध २ रुपये प्रति लिटरनं वाढलं आहे.

खर्च वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून या वस्तूंच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येत आहे. १८ दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात १०-१० रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय सीएनजीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. यामुळे मालवाहतूकीच्या खर्चात वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांत स्टीलच्या दरात प्रतिटन २,५००-३,००० रुपयांची उसळी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे उत्पादन आणि बांधकामाचा खर्च वाढला आहे.