Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 12:14 IST2025-06-16T11:58:19+5:302025-06-16T12:14:43+5:30
Kedarnath Helicopter Crash: केदारनाथहून गुप्तकाशीला परतणाऱ्या आर्यन हेली एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला.

रुद्रप्रयागमधील गौरीकुंडमधील गौरीमाई खार्क येथे काल (१५ जून रोजी) झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आर्यन कंपनीच्या दोन व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महसूल उपनिरीक्षकांनी सोनप्रयाग पोलिसात कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
यामध्ये असे म्हटले आहे की, हा अपघात निष्काळजीपणामुळे झाला. हेलिकॉप्टर अपघाताचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात असले तरी, हेली कंपनीने यूसीएडीए आणि डीजीसीएच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचेही मानले जात आहे. 'आर्यन हेली कंपनीला सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंतचा स्लॉट सकाळी ५.२४ वाजता देण्यात आला होता, परंतु कंपनीने हेलिकॉप्टर सकाळी ५.११ वाजता उडवण्यास सुरुवात केली, केदारनाथहून परतताना पहाटे ५.२४ वाजता हा अपघात झाला', असं या तक्रारीत म्हटले आहे.
'डीजीसीए आणि यूकेएडीएने जारी केलेल्या एसओपीमधील फ्लाइंग स्लॉटनुसार उड्डाण करण्यास सांगितले होते. या संदर्भात, आर्यन एव्हिएशनचे बेस मॅनेजर विकास तोमर आणि जबाबदार मॅनेजर कौशिक पाठक यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही सर्वात मोठी चूक आहेट, असं तक्रारीत म्हटले आहे.
फाटा रेव्हेन्यू सब इन्स्पेक्टरने अपघातात सात लोकांच्या मृत्यूसाठी कंपनीच्या दोन्ही व्यवस्थापकांना थेट जबाबदार धरले आहे. त्यांच्याविरुद्ध कोतवाली सोनप्रयाग येथे भारतीय दंड संहिता १०५ च्या कलम २८/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ आणि कलम १० विमान कायदा १९३४ विरुद्ध विकास तोमर आणि कौशिक पाठक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेलिकॉप्टर अपघात पाहणाऱ्या महिलांनी सांगितले की, धुके जास्त होते. हेलिकॉप्टर आमच्यापासून फक्त वीस मीटर अंतरावर पडले, हेलिकॉप्टरला मोठी आग लागली होती.
गौरीकुंडमध्ये राहणाऱ्या दोन्ही महिला रविवारी पहाटे ४ वाजता इतर स्थानिक महिलांसह गौरी माई खार्कला निघाल्या होत्या. त्या यात्रेत वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खेचरांसाठी गवत कापण्याचे काम करतात.
थोड्याच वेळात, एक हेलिकॉप्टर त्या भागात पोहोचले, यावेळी परिसरात दाट धुके पसरले होते. धुक्यामुळे, हेलिकॉप्टर थोडे वळले आणि मागे गेले आणि नंतर थोडे खाली आले आणि पुढे जाऊ लागले, यामुळे ते एका उंच झाडाला धडकले आणि थेट जमिनीवर पडले.
महिलेने सांगितले की, ज्यावेळी आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तिथे एक मुलगी पडली होती, ती जिवंत नव्हती. कदाचित ती मुलगी हेलिकॉप्टरमधून पडली आणि जमिनीवर एका मोठ्या दगडावर आदळली, यामुळे तिचा मृत्यू झाला.
केदारनाथहून गुप्तकाशीला परतणारे आर्यन हेली एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे गौरी माई खार्क येथे झाडावर आदळले. या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील एका २३ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. तिच्या पालकांचाही या अपघातात मृत्यू झाला.