इस्रोचं मोठं यश! वीज कोसळण्याच्या ३ तास आधीच मिळणार अलर्ट, 'हा' उपग्रह ठरणार वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:13 IST2025-06-02T13:08:45+5:302025-06-02T13:13:43+5:30

जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणजे वीज कोसळणे. दरवर्षी वीज कोसळून अनेकांचा जीव गेल्याचे आपण ऐकलेच असेल. मात्र, आता इस्रोने यावर उपाय म्हणून एक नवीन उपग्रह तयार करून मोठं यश मिळवलं आहे.

पाऊस, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींमुळे दरवर्षी शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. अशाच जीवघेण्या नैसर्गिक आपत्तींपैकी एक म्हणजे वीज कोसळणे. दरवर्षी वीज कोसळून अनेकांचा जीव गेल्याचे आपण ऐकलेच असेल. मात्र, आता इस्रोने यावर उपाय म्हणून एक नवीन उपग्रह तयार करून मोठं यश मिळवलं आहे.

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, २००२ ते २०२२ दरम्यान, वीज कोसळून ५२,४७७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय, वैज्ञानिक अभ्यासानुसार, १९६७ ते २००० दरम्यान, वीज पडून तब्बल १ लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला.

वीज पडण्यापूर्वी लोकांना सावध करण्याची सुविधा असती, तर कदाचित हे मृत्यू टाळता आले असते, असे सगळ्यांनाच वाटले असेल. यावरच आता संशोधन करून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी एका उपग्रहाची निर्मिती केली आहे, जो वीज पडण्याच्या ३ तास ​​आधीच आपल्याला इशारा देईल.

आकाशापासून ३६,००० किमी वर असणार हा उपग्रह वीज पडण्याच्या ३ तास ​​आधी वातावरणातील अगदी लहान बदल देखील ओळखू शकण्यास सक्षम आहे. आकाशातील प्रत्येक सिग्नल वाचण्याचे रहस्य त्याच्या ओएलआरमध्ये आहे, ज्याला आउटगोइंग लाँग वेव्ह रेडिएशन देखील म्हणतात.

भारताच्या INSAT-3D उपग्रहाचा वापर करून नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर मधील शास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की वीज पडण्यापूर्वी, याचे रेडिएशन बदलते आणि त्यामुळे वीज पडणार असल्याचा अंदाज घेता येतो.

अगदी सामान्य आणि सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, हा उपग्रह वीज पडण्यापूर्वी पृथ्वीच्या उष्णतेच्या सिग्नलमधील बदल ओळखतो. त्यामुळे विजेचा अंदाज लावणे सोपे होते.

या उपग्रहाद्वारे इस्रोच्या टीमने जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान, ढगांची हालचाल आणि बाहेर पडणाऱ्या लांब रेडियएशन लाटा यांचे एकत्र मोजमाप केले. त्यामुळे वीज कुठे पडणार, याचा अंदाज ३ तास आधीच वर्तवणे शक्य झाले.

INSAT मालिकेतील डेटा स्वयंचलितपणे नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर सर्व्हरवर प्रसारित केला जाईल. यानंतर, त्याचा अभ्यास करून विशेष अल्गोरिदम संभाव्य वीज क्षेत्रे आधीच ओळखू शकेल. याचा सर्वाधिक फायदा शेतकरी आणि कामगारांना होईल.