20 वर्षांपूर्वी भारताने पाहिले होते 'गगनयान'चे स्वप्न, इस्रो 'हे' त्रिकुट साकार करणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 05:43 PM2023-10-27T17:43:50+5:302023-10-27T17:50:18+5:30

इस्रो आपल्या महत्वाकांक्षी 'गगनयान' मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. नुकतीच याची यशस्वी चाचणी करण्यात आली.

ISRO Gaganyaan: चंद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रो गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. इस्रो 2025 मध्ये पहिल्यांदाच एका मानवाला अंतराळात पाठवणार आहे. अलीकडेच इस्रोने गगनयान क्रू मॉड्यूलचे यशस्वी लॉन्चिंग केले. हे एक चाचणी उड्डाण होते, जे आकाशात 17 किमीपर्यंत गेले. या मॉड्यूलचे सुरक्षित परत येणे, हे भारताचे 20 वर्ष जुने स्वप्न साकार होणार असल्याचे द्योतक आहे.

गगनयान भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे, गगनयानातून भारतीय अंतराळवीर पहिल्यांदाच अंतराळात प्रवास करणार आहेत. यासाठी एक कॅप्सूल तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये तीन अंतराळवीर जाऊ शकतील हे अंतराळात 400 किमीपर्यंत जाऊन परत पृथ्वीवर परत येईल. हे मिशन तीन दिवस चालणार आहे, पण त्याची तयारी करण्यात अनेक वर्षांचा वेळ लागला आहे. अंतराळवीरांचे सुरक्षित परतणे इस्रोसाठी जास्त महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीचा विचार केला जातोय. इस्रोच्या संपूर्ण टीमसह एक विशेष त्रिकूट या अभियानात महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

20 वर्षांपूर्वी पाहिले होते स्वप्न-भारताने 2004 मध्ये पहिल्यांदा मानवयुक्त अंतराळ मोहिमेचे स्वप्न पाहिले. रिपोर्टनुसार, गगनयानचा विकास 2006 मध्ये सुरू झाला. त्याचा प्रोटोटाइप अशा प्रकारे तयार करण्यात आला होता, ज्यात दोन अंतराळवीरांना अंतराळात नेता येईल. मार्च 2008 मध्ये त्याची रचना अंतिम करून सरकारला सादर करण्यात आली. त्यासाठीचे बजेटही 2009 मध्ये मंजूर झाले होते. 2014 पर्यंत भारत आपली पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम प्रक्षेपित करण्याची अपेक्षा होती, पण अंतराळवीरांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रोला वेळ लागला.

मंगळयान-चंद्रयानापेक्षा गगनयान अवघड- गगनयान मोहिमेसमोरील सर्वात मोठे आव्हान अंतराळवीरांना परत आणण्याचे आहे, यामुळेच इस्रोच्या मंगळयान-चंद्रयान-सूर्ययानापेक्षा हे अधिक गुंतागुंतीचे आहे. इस्रोने प्रक्षेपित केलेले सॅटेलाईट, मंगळयान किंवा चंद्रयान अंतराळात राहणार आहेत. गगनयान हे पहिलेच मिशन आहे, जे अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाईल आणि परतही आणेल. याशिवाय अशी कॅप्सूल विकसित करण्याचीही गरज आहे, ज्यामध्ये अंतराळवीर वर गेल्यावर जिवंत राहू शकतील. या सर्व गोष्टींवर इस्रोचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यासाठी एका त्रिकुटाची महत्वाची भूमिका आहे.

एस सोमनाथ: इस्रोचे प्रमुख श्रीधर पणिकर सोमनाथ, म्हणजेच एस सोमनाथ एरोस्पेस इंजिनीअर आहेत. ते स्वत: गगनयान मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, विक्रम साराभाई अंतराळ केंद्रातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच यान उतरवले.

एस उन्नीकृष्णन: विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस उन्नीकृष्णन हे गगनयान मोहिमेचे दुसरे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे लॉन्च व्हीकल डिझाइन करणे आणि स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपेरिमेंटची जबाबदारी आहे. याआधी ते ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर, बंगळुरूचे संचालक होते. ते भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे अतिरिक्त संचालकदेखील आहेत.

व्हीआर ललितांबिका: VR ललितांबिका भारताच्या गगनयानमागील तिसरा सर्वात मोठा चेहरा आहे. इंडियन ह्युमन स्पेसफ्लाइट प्रोग्रामच्या डायरेक्टर या नात्याने त्या दीर्घकाळापासून गगनयान मिशनशी जोडल्या गेल्या आहेत. VR ललितांबिका या अॅडव्हान्स्ड लॉन्चर टेक्नोलॉजी तज्ञ आहेत. त्यांनी 100 हून अधिक अंतराळ मोहिमांमध्ये प्रमुख भूमिका बजावली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक ASLV, PSLV, GSLV लॉन्च केले आहेत.