एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 14:27 IST2025-04-28T14:22:58+5:302025-04-28T14:27:45+5:30

India Vs Pakistan War: १९८० च्या दशकामध्ये सियाचिनवर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. यावेळी ते मालौन चौकीवर तैनात होते. ओम प्रकाश यांनी एकट्याने हा हल्ला परतवून लावला होता.

जगातील दुसऱ्या सर्वात उंचीवरील रणांगण असलेल्या सियाचिनमध्ये भारतीय सैनिकांचा एक देव आहे, जो त्यांचे सदैव रक्षण करतो, असे मानले जाते. ओपी बाबा असे या देवाचे नाव असून ते भारतीय सैन्याचाच एक भाग होते. हिमस्खलन व्हायचे असेल किंवा अन्य कोणते संकट यायचे असेल तर ओपी बाबा सैनिकांच्या स्वप्नात येऊन त्यांना याची माहिती देतात आणि सैन्याचे रक्षण करतात अशी आख्यायिका आहे.

१९८० च्या दशकामध्ये सियाचिनवर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. यावेळी ते मालौन चौकीवर तैनात होते. ओम प्रकाश यांनी एकट्याने हा हल्ला परतवून लावला होता. यानंतर त्यांचा रहस्यमयी मृत्यू झाला होता. पाकिस्तानी हल्ला परतवून लावल्यानंतर ते शहीद झाले होते असे सांगितले जाते. सियाचिनमध्ये पोस्टिंग झाली की तिथे जाणारा प्रत्येक सैनिक ओपी बाबांच्या मंदिरात पाया पडायला जातो.

ओपी बाबांना सियाचिनचा सर्वात मोठा कमांडर म्हटले जाते. त्यांनी अनेकदा स्वप्नात येऊन सैनिकांचे प्राण वाचविल्याचे किस्से सैन्यात सांगितले जातात. ओपी बाबांचा आत्मा आजही ग्लेशिअरवर तैनात जवानांची मदत करतो.

अनेक जवानांनी तसे दावे केले आहेत. जर रस्ता चुकले तर ओपी बाबा त्यांना मदत करतात असे ते सांगतात. बर्फाचे वादळ किंवा हिमस्खलन होणार असेल तरीही ते एखाद्या सैनिकाच्या स्वप्नात येऊन सावध करतात. सीमेवरही काही संकट असेल तरी ते सांगतात, असे सांगितले जाते.

ओपी बाबांचे मंदिर सियाचीनमधील भारतीय लष्कराच्या तळाजवळ आहे. मंदिर उभारण्यापूर्वी सैनिक ओपी बाबांचे नाव घेऊन टेंटमध्येच जमिनीवर डोके टेकवत होते. १९९६ मध्ये, ओपी बाबांचे मंदिर एका छोट्या झोपडीत होते.

२००३ च्या भारत-पाकिस्तान करारानंतर मंदिरात रूपांतर करून त्याला कायमचे स्वरूप देण्यात आले. हिमनदी तीन बाजूंनी पाकिस्तान आणि चीनने वेढलेली आहे आणि दिवसाही तापमान -३० ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. अशा ठिकाणी भारतीय सैन्य पहारा देत असते.

सैनिक केवळ पूजाच करत नाहीत तर मोहिमेच्या सुरुवातीला आणि शेवटी औपचारिक अहवाल देखील बाबांच्या समोर ठेवला जातो.

या मंदिराबद्दल अनेक कथा आहेत, त्यापैकी एक म्हणजे २०१६ मध्ये सियाचीनमध्ये हिमस्खलनात अडकलेले लान्स नाईक हनुमंतप्पा यांना ६ दिवसांनी वाचवण्यात आले. काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला तरी ही घटना सैनिकांमध्ये ओपी बाबांप्रती आस्था वाढविणारी ठरली होती.