India China FaceOff: मोठी बातमी! चीनचा लडाखजवळ सायबर हल्ला; 'ड्रॅगन'चा डाव भारतानं उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 06:42 PM2022-04-07T18:42:58+5:302022-04-07T18:47:04+5:30

पूर्व लडाखमध्ये सैन्य तैनात केल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून चीन आणि भारत (India China) यांच्यात गंभीर संघर्ष सुरू आहे. याचवेळी भारताची वीज वितरण व्यवस्था ठप्प करण्यासाठी चीनने भारतीय पॉवर ग्रीडवर दोनदा सायबर हल्ला केल्याची चर्चा आहे. चीनचा हा डाव भारतानं हाणून पाडला.

चीनने सायबर हॅकिंगचा आरोप फेटाळून लावत चोरी आणि असभ्य वृत्तीचे समर्थन केले आहे. ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले आहे की, सायबर घटनांच्या तपासात पूर्ण पुरावे हवेत. अशा प्रकारे तपासाशिवाय इतर कोणत्याही देशाशी संबंध जोडू नयेत.

भारतात ड्रॅगनचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. भारत सरकारने या घटनेला दुजोरा दिला आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री आरके सिंह यांनी सांगितले की, लडाखजवळील वीज वितरण केंद्रांना लक्ष्य करण्याचा चिनी हॅकर्सनी दोनदा प्रयत्न केले होते पण ते यशस्वी झाले नाहीत.

अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारताने आपली यंत्रणा आणखी मजबूत केल्याचे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सायबर हल्ल्यात रेडेको नावाच्या हॅकिंग ग्रुपचे नाव समोर आले आहे. या गटाचा अप्रत्यक्षपणे चीन सरकारशी संबंध असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

पॉवर ग्रिडवर सायबर हल्ले करून, हा गट आर्थिक आणि गुप्तचर माहिती जमा करण्याचं काम करतात. जेणेकरून भविष्यातील युद्धाच्या प्रसंगी ते सायबर हल्ले करून त्या देशाची वीज वितरण व्यवस्था ठप्प करू शकतात असंही सांगितले जात आहे.

उर्जा क्षेत्राव्यतिरिक्त, चिनी हॅकर्सनी भारताच्या राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणि बहुराष्ट्रीय लॉजिस्टिक कंपनीच्या उपकंपनीला देखील लक्ष्य केले आहे. TAG-38 असे हॅकिंग करणाऱ्या ग्रुपचे नाव आहे. या टोळीने त्यांच्या योजना पूर्ण करण्यासाठी ShadowPad नावाचे धोकादायक सॉफ्टवेअर वापरले आहे. या सॉफ्टवेअरचे धागेदोरे आधीच चिनी सैन्याशी जोडले आहेत.

अलीकडेच चीनमधील डिजिटल वॉलेट अलीपे(AliPay) च्या नेपाळ एन्ट्रीनं भारतीय सुरक्षा व्यवस्था चिंतेत आल्या होत्या. कारण नेपाळमध्ये मोठ्या संख्येने विद्यमान आणि सेवानिवृत्त भारतीय लष्करी सैन्याचे कर्मचारी राहतात. ज्यांना भारतीय लष्कर पगार अथवा पेंशन देते.

चिनी कंपन्यांचे प्रतिनिधी नेपाळमधील गावोगावी पोहोचत आहेत आणि खाते उघडल्यावर २००० नेपाळी रुपये देऊन आमिष दाखवण्याचाही प्रयत्न करत आहेत. खाते उघडताना ग्राहकाला त्याचा पासपोर्ट, बँक खाती आणि व्यवहारासारखी सर्व माहिती चायनीज कंपनीला द्यावी लागेल हा धोका आहे.

सायबर हेरगिरी आणि गुन्ह्यांसाठी चीन जगभर कुप्रसिद्ध आहे. चिनी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या हेतूवर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. चिनी सैन्य अनेक दिवसांपासून सायबर हल्ल्यासाठी तयार आहे. या डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून चीन भारतीय लष्कराच्या मोठ्या भागात घुसखोरी करू शक्यताही वर्तवण्यात आली होती.

सध्या जगात रशिया-यूक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यूक्रेनवर हल्ल्या केल्याप्रकरणी अमेरिकेसह नाटो देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत चीनने उघडपणे रशियाचे समर्थन केले आहे. रशियाच्या या हल्ल्यामुळे चीनला शेजारील राष्ट्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.