भाजपाकडून करेक्ट कार्यक्रम, इंडिया आघाडीला दणका! काँग्रेसच्या आमदारांमुळे कसे बिघडले गणित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:29 IST2026-03-17T12:21:08+5:302026-03-17T12:29:00+5:30

Rajya Sabha Election 2026 Explained: राज्यसभेच्या एकूण ३७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ११ जागांसाठी तीन राज्यांमध्ये मतदान झाले. या मतदानामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका बसला.

राज्यसभेच्या ११ जागांसाठी झालेल्या मतदानानंतर आलेल्या निकालाने इंडिया आघाडीला आणखी एक झटका दिला. बिहार, ओडिशा आणि हरयाणा या तीन राज्यात ११ जागांसाठी मतदान झाले. यात काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेस व्होटिंग तसेच, मतदान न केल्याने थेट फायदा एनडीएला झाला.

भाजपाने काँग्रेसची मते फोडण्यात यश मिळवत एक जास्तीची जागा जिंकली. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांकडून करण्यात आलेल्या क्रॉस व्होटिंगने इंडिया आघाडीतील पक्षांना चुकीचा संदेश गेला आहे. ३७ जागांपैकी २६ जागांवर बिनविरोध निवडणूक पार पडली. उर्वरित ११ जागांसाठी झालेल्या मतदानात विरोधी इंडिया आघाडी मतांचे गणित जुळवण्यात अपयशी ठरली.

बिहारमध्ये इंडिया आघाडीच्या आमदारांनी मतदान करणेच टाळल्याने एनडीएचा पदरात जागा पडली. एनडीएचे उमेदवार शिवेश कुमार यांना पहिल्या पसंतीची ३० मते मिळाली होती. तर महाआघाडीचे अमरेंद्र धारी सिंह यांना ३७ मते मिळाली. पण, चार आमदारांनी मतदान न केल्याने, दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेत शिवेश कुमार विजयी झाले.

बिहारमध्ये काँग्रेसच्या तीन, तर राष्ट्रीय जनता दलाच्या एका आमदाराने मतदानच केले नाही. त्यामुळे भाजपाने बिहारमधील पाचही जागांवर विजय मिळवला आणि इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत नाराजी निर्माण झाली आहे.

ओडिशामध्येही काँग्रेस आणि बीजेडीच्या काही आमदारांनी भाजपा उमेदवाराला मतदान केले. चार जागांसाठी मतदान झाले. दिलीप राय यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर विजय मिळवला. बीजेडीच्या आठ, तर काँग्रेसच्याही तीन आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याने भाजपाला एक ऐवजी दोन जागांवर विजय मिळाला. तर इंडिया आघाडीच्या एकीलाच तडा गेला आहे.