हत्तींची आजी गेली! १०० वर्षे जगली 'वत्सला'; वाचा आशिया खंडातील सर्वात वयस्कर हत्तीणीबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:04 IST2025-07-11T16:56:59+5:302025-07-11T17:04:16+5:30
Vatsala Elephant Story: मध्य प्रदेशातील पन्ना राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातून आलेल्या एका बातमी देशभरातली प्राणीप्रेमी हळहळले. पन्नातील हत्तीची आजी वत्सला हत्तीण गेली. १०० व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आणि सगळ्यांना भरून आले.

वत्सला गेली! नावाप्रमाणेच ती राहिली, जगली आणि निरोप घेतला. १०० आयुष्याची शंभर वर्ष जंगल्यानंतर वत्सलाने अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाचे वृत्त धडकले तेव्हा मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, वत्सला एक हत्तीण नव्हती, ती आपल्या जंगलाची मूक संरक्षक होती, मैत्रीण होती.
'तिने हत्तींच्या कळपाचे नेतृत्वही केले आणि एका आजीप्रमाणे हत्तींच्या पिल्लांना प्रेमाने जपले आणि वाढवले', अशा शब्दात मुख्यमंत्री यादव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
वत्सला आशिया खंडातील सर्वात वयोवृद्ध हत्तीण होती. अखेरच्या काळात तिची दृष्टी गेली. तेव्हा तिने वाढवलेल्या हत्तीच्या पिल्लंच तिला मार्ग दाखवायचे.
वत्सलाचा जन्म केरळमधील निलांबूरमध्ये झाला होता. १९७० मध्ये तिला मध्य प्रदेशातील बोरी जंगलात आणले गेले. तिथे ती लाकडं घेऊन जाण्याचं काम करायची. १९९२ मध्ये वत्सलाला पन्ना राष्ट्रीय अभारण्यामध्ये नेण्यात आलं.
२००३ पर्यंत ती पर्यटकांना जंगलाची सफर घडवून आणायची. त्यानंतर ती कळपात गेली आणि हत्तींची आजी झाली. २००१ मध्ये एका हत्तीणीने पिलाला जन्म दिला. त्या पिलाचा वत्सलाने लेकरासारखा सांभाळ केला.
या अभारण्यात जितकी हत्तींची पिलं जन्माला आली, वत्सला त्यांना आजीचं प्रेम देत राहिली. नॅशनल पार्कमधील जे लोक तिची देखभाल करायचे त्यांनी सांगितले की, वत्सलाने तब्बल ३२ पिल्लांना सांभाळलं.
हत्तीच्या लहान पिल्लांना ती नेहमी जवळ ठेवायची. कुणालाही एकटं सोडायची नाही आणि त्यामुळेच तिला हत्तींची आजी म्हटले जाते.
हळूहळू वय वाढत गेलं आणि वत्सलाचे शरीरही थकत गेले. नजर कमजोर झाली आणि तिची दृष्टीही गेली. तिची दृष्टी गेल्यावर ज्या पिल्लांना तिने वाढवलं, ते तिचा आधार बनले आणि मार्ग दाखवायचे.
वत्सलाने आजी होऊन ज्यांना प्रेम दिलं, त्यांनीही कधीही तिला एकटं पडू दिलं नाही. अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत.
वय वाढलं, वृद्धकाळामुळे वत्सलाचा आजार बळावला. काही महिन्यांपासून ती आजारीच होती. डॉक्टर आणि हत्ती तिची काळजी घेत होते. पण, ८ जुलै रोजी तिची प्राणज्योत मालवली. तिच्या जाण्याने तिची काळजी घेणाऱ्या सगळ्यांचेच डोळे भरून आले होते.