दिल्लीत ‘आप’ला धक्का, पाच कारणं, ज्यामुळे केजरीवाल यांच्या पक्षाची झाली पीछेहाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:27 IST2025-02-08T12:23:55+5:302025-02-08T12:27:40+5:30
Delhi Election 2025 Results Live Update: दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली याची कारणमीमांसा सुरू झाली आहे. दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची पाच महत्त्वाची कारणं पुढील प्रमाणे आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. त्यात ४२ जागांवर भाजपाने आघाडी घेतली आहे. तर आम आदमी पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपाचं पुनरागमन होत आहे. दिल्लीमध्ये अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्यानंतरही अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची पीछेहाट का झाली याची कारणमीमांसा सुरू झाली आहे. दिल्लीत दहा वर्षे निर्विवाद सत्ता राबवल्यानंतरही आपचा पराभव का झाला याची पाच महत्त्वाची कारणं पुढील प्रमाणे आहेत.
भ्रष्टाचाराचे आरोप
मागच्या पाच वर्षांत आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन या आपच्या प्रमुख नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. तसेच या प्रकरणात त्यांना तुरुंगवासाचा सामनाही करावा लागला. या सर्वामुळे पक्षाच्या प्रतिमेला जबरदस्त धक्का बसला. तसेच भ्रष्टाचारविरोधी पक्ष अशी असलेली आपची प्रतिमा धुळीस मिळाली आहे. त्याशिवाय यमुना नदीची स्वच्छता, दिल्लीत पॅरिसच्या दर्जाचे रस्ते आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं होतं. मात्र ही आश्वासनं पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या निवडणुकीत आपचं मोठं नुकसान झालं
नेतृत्वामधील अस्थैर्य
अरविंद केजरीवाल यांना गतवर्षी झालेली अटक आणि नंतर त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे दिल्लीत आम आदमी पक्षाचं नेतृत्व अस्थिर झालं. आतिशी यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतरही पक्षाच्या नेतृत्वाबाबतची अनिश्चितता संपली नाही. एवढंच नाही तर भ्रष्टाचाराविरोधात रान उठवून नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या केजरीवाल यांची विश्वासार्हता भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कमालीची डागाळली. त्याचा फटका आपला या निवडणुकीत बसला.
काँग्रेसने फोडलेली मतं
दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. मात्र दिल्लीमध्ये काँग्रेसने आम आदमी पक्षाची मतं मोठ्या प्रमाणावर फोडून अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं जबरदस्त नुकसान केलं. २०१३ नंतर काँग्रेसची व्होटबँक आम आदमी पक्षाकडे सरकली होती. मात्र यावेळी काँग्रेसने आपची काही मतं आपल्याकडे खेचल्याने आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
अंतर्कलह आणि राजीनामे
आम आदमी पक्षामध्ये असलेले अंतर्कलह आणि त्यामधून प्रमुख नेत्यांनी दिलेले राजीनामे हेही आपच्या आज झालेल्या या पराभवाचं एक कारणं ठरलं. गतवर्षी झालेलं स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण, तसेच कैलाश गहलोत, राजकुमार आनंद यांच्यासारख्या काही नेत्यांनी ऐनवेळी दिलेला राजीनामा यामुळे पक्षाचा संघटनात्मक कमकुवतपणा उघड झाला.
विरोधी पक्षांच्या आरोपांचा जनमानसावर पडलेला प्रभाव
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विरोधी पक्षांनी आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आरोपांची मालिका लावली होती. आप आणि केजरीवाल यांच्या कथित मद्य घोटाळ्यात असलेला सहभाग, केजरीवाल यांचं आलिशान निवासस्थान आदिंवरून भाजपाने आपची कोंडी केली होती. तर काँग्रेसनेही आपविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. तसेच फ्रीबिजच्या घोषणाही आपला मतदान मिळवून देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आपला मोठा फटका बसला.