दहशत! बिहारच्या 'या' गावातून अचानक गायब होतायेत सर्व पुरुष; कोणत्या गोष्टीची सतावतेय भीती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:49 IST2026-02-05T11:43:11+5:302026-02-05T11:49:14+5:30

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील कुशेश्वरस्थान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हरिनगर गावात पैशाच्या वादावरून हिंसक संघर्ष घडला. त्यानंतर आता गावातील ७० घरांमधील पुरुषांनी गाव सोडले आहे. या घरात सध्या एकही पुरुष हजर नाही. हिंसाचारानंतर गावात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण आहे. त्याशिवाय पोलीसही मोठ्या संख्येने गावात बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

या प्रकरणात ७० नामांकित ब्राह्मणासह जवळपास १५० अज्ञात लोकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने गावातील ७० घरांमध्ये एकही पुरुष हजर नाही. गावातील सामान्य जीवन ठप्प झाले आहे. दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सामानही लोकांना मिळत नाही.

लोक भीतीच्या सावटाखाली गावात वावरत आहेत. हरिनगर गावात राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, आमच्या गावात याआधी कधीच असे घडले नाही. आम्ही सगळे मिळून मिसळून राहत होतो परंतु अचानक सर्व काही बदलले. गावात पूर्ण तणावाचे वातावरण आहे.

गावातील पंचायतीचे मुख्य विमल चंद्र खान यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ३० जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर ३१ जानेवारीला इतकी मोठी घटना घडली नसती असं त्यांनी म्हटले. तर पोलीस कुठल्याही निर्दोषावर कारवाई करणार नाही असं आश्वासन एसएसपी जगुनाथ रेड्डी यांनी दिले.

नेमके काय घडले? - अशर्फी पासवानद्वारे दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार, २०१५ साली घराच्या बांधकामात असलेल्या मजुरांची थकबाकी यावरून हा वाद झाला. माझा मुलगा विक्रम पासवान यांनी हेमकांत झा यांच्या घराचे बांधकाम केले, परंतु २.५० लाख रुपयांची मजुरी त्यांनी दिलीच नव्हती असा आरोप आहे.

३० जानेवारीला हेमकांत झा यांचा जावई गावात आला तेव्हा पासवान यांनी झा यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की गावात ३१ जानेवारीला हिंसक संघर्ष झाला. अनेक लोक हातात काठी, लोखंडी रॉड घेऊन पासवान यांच्या घरात घुसले आणि त्यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत पासवना यांना मारहाण केली.

पासवान यांच्या कुटुंबातील महिलांसोबत गैरवर्तन केले. घरात लूटही केली असा आरोप आहे. पासवान यांच्या तक्रारीवरून गावातील ७० नामांकित ब्राह्मणांसह १००-१५० अज्ञात लोकांविरोधात SC/ST कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३१ जानेवारीला रात्री गावात आर्थिक वादावरून मोठा संघर्ष झाला. या हिंसाचारात जवळपास १० हून अधिक लोक जखमी झाले. आतापर्यंत यात १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यापुढेही पोलिसांची कारवाई सुरू आहे. गावातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या गावात तणाव असला तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

मुजरीच्या पैशाच्या थकबाकीवरून गावात ३१ तारखेला पासवान आणि ब्राह्मण समाजात हिंसक तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येने ब्राह्मण समाजातील लोकांनी पासवान कुटुंबावर हल्ला केला. त्यांच्या दुकान आणि घरातील सामानांची तोडफोड केली. हेमकांत झा आणि कैलाश पासवान यांच्यात आर्थिक वाद होता. परंतु हेमकांत यांची बहीण आणि त्यांच्या पतीला रस्त्यात मध्येच थांबवून धक्काबुक्की आणि अपमानित केले गेले असा आरोप ब्राह्मण समाजातील लोकांचा आहे.

मूळ वाद पैशांवरून सुरू झाला तो जातीय हिंसाचारात बदलला. पोलिसांनी या घटनेतील गुन्ह्यात अशा लोकांचीही नावे घातली आहेत जे घटनेवेळी गावात हजरही नव्हते. जे दोषी आहेत त्यांना वगळण्यात आले तर इतरांना या प्रकरणात जाणुनबुजून अडकवले जात असल्याचा आरोप आहे. परंतु अटकेच्या भीतीने गावातील पुरुष फरार आहेत.