Cyclone Michuang : विध्वंस! चेन्नईत मिचाँग चक्रीवादळाचे थैमान, 17 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:11 AM2023-12-06T11:11:45+5:302023-12-06T11:42:10+5:30

Cyclone Michuang : मिचाँग चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस झाला. चेन्नईमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

मिचाँग चक्रीवादळामुळे तामिळनाडूची राजधानी चेन्नई तसेच इतर अनेक जिल्ह्यांमध्ये विध्वंसाची दृश्यं पाहायला मिळत आहेत. सर्वत्र पाणी साचल्याने रस्ते ठप्प झाले. जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या अनेक भागांमध्ये बचाव कार्य सुरू असल्याने विमान आणि रेल्वे सेवा पूर्ववत होत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने मंगळवारी सांगितलं की, चक्रीवादळ मिचाँग मार्ग पूर्ण झाला आहे, तर ओडिशा आणि पूर्व तेलंगणातील दक्षिणेकडील जिल्हांना अलर्ट करण्यात आलं आहे. (फोटो- पीटीआय)

चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस झाला. चेन्नईमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सध्या, दिलासा देणारी बाब म्हणजे चेन्नईमध्ये पाऊस कमी झाला आहे

भारतीय वायुसेनेचे (IAF) चेतक हेलिकॉप्टर चेन्नईत पूर मदत कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 29 एनडीआरएफ टीम्स मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. (फोटो- पीटीआय)

द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांनी मंगळवारी सांगितले की, चेन्नईतील पुरामुळे बाधित लोकांना स्थलांतरित करण्यासाठी 400 हून अधिक निवारे तयार करण्यात आले आहेत. चेन्नई विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी साचले होते, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. (फोटो- पीटीआय)

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू येथील शाळा 6 डिसेंबर रोजी बंद राहतील. अभिनेता आमिर खान त्याच्या टीमसह अडकला होता. चेन्नईच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांची सुटका केली. बॅडमिंटनपटू आणि अर्जुन पुरस्कार विजेती ज्वाला गुट्टाचाही समावेश आहे. (फोटो- पीटीआय)

चेन्नईमध्ये लोकांना दिलासा देण्यासाठी आणि पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करण्यासाठी द्रमुकने मंगळवारी 5,000 कोटी रुपयांची त्वरित केंद्रीय मदतीची मागणी केली.

तामिळनाडू सरकारने सांगितलं की त्यांचं मुख्य ध्येय हे 80% वीज पुरवठा पुनर्संचयित करणे आहे आणि 70% मोबाईल नेटवर्क आधीच पुनर्संचयित केले गेले आहेत.