चक्रीवादळ बिपरजॉयचा फटका; 12 हजारांहून अधिक विजेचे खांब कोसळले; अनेक गावांमध्ये बत्ती गुल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 06:18 PM2023-06-14T18:18:37+5:302023-06-14T18:30:36+5:30

कुठे जोरदार वारे वाहत आहेत तर कुठे मुसळधार पाऊस पडत आहे.

अरबी समुद्रातून निर्माण झालेले चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनारपट्टीकडे सरकत आहे. बिपरजॉयचा प्रभाव गुजरातमध्ये दिसत आहे. चक्रीवादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. त्याचा परिणाम राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे.

चक्रीवादळ पोरबंदरपासून दूर सरकले आहे, परंतु देवभूमी द्वारका आणि कच्छच्या किनारी भागाकडे सरकत आहे. कुठे जोरदार वारे वाहत आहेत तर कुठे मुसळधार पाऊस पडत आहे. 12 हजारांहून अधिक विजेचे खांब कोसळले आहेत. यामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. बिपरजॉयला सामोरे जाण्यासाठी सरकारने विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे.

तसेच, जवानांना संपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी बिपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यापूर्वी कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरात मच्छिमार वसाहतीचे नुकसान झाले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज गुजरातमधील भुज येथे लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांशी संवाद साधला आणि एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.

गुजरातच्या किनारी भागात दाखल झालेल्या बिपरजॉयचा प्रभाव फोटोंमधून स्पष्टपणे दिसत आहे. चक्रीवादळ बिपरजॉयमुळे बुधवारी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील मांडवी समुद्रकिनारी समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळल्या.

बिपरजॉयला सामोरे जाण्यासाठी किनारी भागातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 47 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम सतत लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात गुंतल्या आहेत. त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. बिपरजॉयशी लढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

बिपरजॉयमुळे गुजरातच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, एनडीआरएफच्या 18 आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

बिपरजॉय चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव 15 जून रोजी दिसून येईल. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने 95 गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच, चक्रीवादळामुळे आतापर्यंत भारतात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्येही सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, चक्रीवादळ 150 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह सौराष्ट्र किनारपट्टीवर धडकेल. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ देवभूमी द्वारकापासून २९० किमी अंतरावर आणि गुजरातमधील जाखाऊ बंदरापासून 280 किमी अंतरावर आहे.