coronavirus: कोरोना भारतातून कधी जाणार? वाढत्या रुग्णांमुळे बिघडले गणित, तज्ज्ञांकडून तारीख पे तारीख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 04:07 PM2020-05-07T16:07:57+5:302020-05-07T16:31:06+5:30

भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक अधिकाधिक वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण झाले असून १७८३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक अधिकाधिक वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण झाले असून १७८३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील कोरना नियंत्रणात येणाऱ्या तारखेचे गणित बिघडले आहे. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप नियंत्रणात येण्यासाठीची नवी तारीख तज्ज्ञांकडून जाहीर करण्यात आली आहे.

भारतासोबतच जगातील बहुतांश देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. उद्योग व्यवहार ठप्प आहेत. दरम्यान, देशातून कोरोना कधी जाणार, जगातून कोरोनाचा शेवट कधी होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे.

भारतासह जगातील बहुतांश देशातून कोरोना विषाणू मे अखेरपर्यंत नियंत्रणात येईल, असा दावा सिंगापूरमधील तज्ज्ञांनी केला होता. मात्र सध्यातरी तसे होताना दिसत नाही आहे. त्यामुळे आता कोरोना नक्की कधी जाणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सिंगापूरमधील या तज्ज्ञांनी मे महिन्यात भारतातून कोरोनाची साथ संपुष्टात येईल, असे आपल्या अहवालात म्हटले होते. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे जगभरातील तज्ज्ञांचे गणित बिघडले आहे.

एसयूटीडीच्या संशोधकांनी सक्सेप्टिबल इन्फेक्टेड रिकव्हर्ड एपिडॅमिक मॉडेलच्या मदतीने आंदाज बांधला होता. त्यांनी जगभरातील कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा अवर वर्ल्ड इन डाटा या संकेतस्थळावरून घेतला होता.

२५ एप्रिलला आलेल्या अहवालामध्ये २९ मेपर्यंत जगभरातील कोरोनाचा फैलाव ९७ टक्क्यांपर्यंत संपुष्टात येईल. मात्र कोरोना संपूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी ८ डिसेंबर उजाडावा लागेल असे तज्ज्ञांनी म्हटले होते. मात्र आता हा कालावधी वाढला असून, आता २० डिसेंबर २०२० रोजी कोरोना संपुष्टात येईल.

सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइनने २१ मेपर्यंत भारतातील कोरोनाची साथ ९७ टक्के संपुष्टात येईल, असे म्हटले होते. मात्र आता भारतातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंतचा वेळ लागेल, असे या संस्थेच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दरम्यान, सद्यस्थिती कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. मे महिन्यातील सुरुवातीच्या काही दिवसांतच देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत १० हजारांहून अधिक जणांची भर पडली आहे.

त्यातही भारतातील काही राज्यांमध्ये कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधिकांचा आकडा १६ हजारांवर गेला आहे. त्यानंतर गुजरात, दिल्ली आणि तामिळनाडूमध्येही कोरोना चिंताजनक स्तरावर पोहोचला आहे.

एसयूटीडीने केलेल्या अभ्यासानुसार भारतासह संपूर्ण जगातून कोरोना संपुष्टात येण्याची तारीख रुग्णांच्या संख्येनुसार बदलत राहील. दरम्यान, देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट जेव्हा लोकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होईल, तेव्हाच थांबेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.