देशात कोरोनाची चौथी लाट येणार की नाही?; IIT प्रोफेसरने केला मोठा खुलासा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 03:41 PM2022-05-10T15:41:18+5:302022-05-10T16:00:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,103 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा तब्बल चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,288 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,103 लोकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली आणि रुग्णसंख्या रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा न करण्याचे आवाहन केले. यामध्ये कोरोनाची चौथी लाट येणार की नाही? हा सर्वात मोठा प्रश्न लोकांच्या मनात आहे.

आता आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मणींद्र अग्रवाल यांनी एका नव्या रिसर्चनंतर दावा केला आहे की, भारताला कोरोनाची चौथी लाट पाहावी लागणार नाही. देशातील बहुतेक लोकांमध्ये कोरोना विरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होणे आणि व्हायरसच्या स्वरुपात कोणतेही नवीन मोठे बदल न होणे यासारखी कारणे त्यांनी सांगितली आहेत.

आयआयटी कानपूरमधील संगणक विज्ञान अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक मणींद्र अग्रवाल यांनी कोरोनाचा वेग मोजण्यासाठी गणितीय मॉडेल तयार केले आहे. त्याचे नाव सूत्र असं ठेवण्यात आले आहे.

अग्रवाल यांनी गेल्या दोन वर्षांत अनेकदा कोरोनाबाबत भाकीत केले आहे आणि ते अगदी अचूक ठरले आहे. आता त्यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत माहिती दिली आहे. भारतातील 90 टक्क्यांहून अधिक लोकांनी कोरोनाविरुद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित केली आहे असा दावा केला आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे, लोकांच्या शरीरात त्याच्याशी लढण्याची क्षमता विकसित झाली आहे. भारतात लसीकरणाची पातळीही चांगली आहे. बहुतेक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

ICMR च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सरकारी नोंदींमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांपेक्षा कितीतरी पट जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा 30 पट असल्याचं सांगितलं जात आहे.

जगातील 36 प्रमुख देशांमध्ये Omicron प्रकारावर केलेल्या रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की ज्या लोकांमध्ये व्हायरसविरूद्ध नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे त्यांच्यावर त्याचा जीवघेणा परिणाम होत नाही.

कोरोनाची चौथी लाट येण्याच्या कमी संभाव्यतेमागे प्रा. अग्रवाल हेही एक कारण सांगतात की, या व्हायरसमध्ये आतापर्यंत कोणतेही नवीन मोठे बदल झालेले नाहीत. जे व्हेरिएंट येत आहेत ते BA.2, BA.2.9, BA.2.10 आणि BA.2.12 सारख्या Omicronच्या भावंडांसारखे आहेत.

दिल्ली एनसीआरमध्येही नवीन म्यूटेशन दिसले नाही मणींद्र अग्रवाल यांच्या मते, याचा अर्थ असा आहे की भारतातील 90 टक्क्यांहून अधिक लोकांना आधीच ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे आणि ते बरे झाले आहेत.

अशा परिस्थितीत ओमाय़क्रॉनमुळे कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाही. ते म्हणतात की जेव्हा कोरोना विषाणू नवीन स्वरूपात बाहेर येईल तेव्हाच चौथी लाट येण्याची शक्यता निर्माण होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.