Coronavirus: जागतिक आरोग्य तज्ज्ञांचा इशारा; भारताने लॉकडाऊन हटवण्याची घाई करु नये, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 10:15 AM2020-04-23T10:15:24+5:302020-04-23T10:27:48+5:30

भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दोन टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आलं. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या २० हजारांच्या वर पोहचली आहे. तर ६०० पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन असलं तरी कोरोना रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे.

देशात पहिला लॉकडाऊन २१ दिवसांचा जाहीर करण्यात आला होता. हा पहिला टप्पा १४ एप्रिलला संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर आता हा दुसरा टप्पा संपण्याची अनेक जण वाट पाहत आहेत.

देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन असला तरी काही ठिकाणी २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन असे विभागणी करुन त्या भागात उद्योगधंदे सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ३ मे नंतर देशात लॉकडाऊन वाढवणार की संपवणार नेमकं काय असणार याची कोणालाच माहिती नाही.

सध्या भारतात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे जो ३ मे रोजी संपेल. सर्व लोकांच्या अपेक्षा आहे की ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. मात्र इंडिया टुडे टीव्हीच्या मुलाखतीत खास संभाषणात रिचर्ड हॉर्टन यांनी सुचवले की भारताने लॉकडाऊन हटविण्याची घाई करू नये आणि कमीतकमी १० आठवड्यांसाठी लॉकडाऊनचा विचार करावा.

मात्र भारतात लॉकडाऊन हटवण्याची घाई करु नये, किमान १० आठवडे भारतात लॉकडाऊन कायम ठेवलं पाहिजे अस मत जगातील आघाडीच्या वैद्यकीय जर्नलचे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी सांगितले आहे.

कोरोना महामारी कोणत्याही देशात कायमस्वरुपी नाही, ती स्वत:हून संपुष्टात येईल. आपल्या देशात कोरोना व्हायरसला नियंत्रणात आणण्यासाठी योग्य दिशेने काम सुरु आहे. असं रिचर्ड हॉर्टन म्हणाले

जर भारतात लॉकडाऊन यशस्वी होत असेल तर १० आठवड्यात नक्कीच कोरोनाचं संकट पूर्णपणे संपेल हे आपल्याला दिसून येईल, त्यामुळे व्हायरस बंद झाला तर गोष्टी पुन्हा सर्वसामान्य होऊ शकतात असंही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच सध्या परिस्थिती सामान्य नाही हे खरे आहे. आपल्याला सोशल डिस्टेंसिगचं पालन केलेच पाहिजे. आपल्याला मास्क घालावे लागेल. तसेच, एखाद्याला खासगी स्वच्छतेबद्दल खूप सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे असं रिचर्ड हॉर्टन यांनी सांगितले.

भारतातील लॉकडाऊन लवकरच संपेल यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, आपल्याला पुन्हा आर्थिक चक्र सुरू करावं लागेल, पण त्यासाठी घाई करू नका. जर आपण घाईघाईने लॉकडाऊन उचलले आणि नंतर आपल्याकडे रोगाचा दुसरा टप्पा आला तर तो पहिल्या टप्प्यापेक्षा वाईट असू शकतो. प्रत्येकाला कामावर जायचे आहे, परंतु घाई करू नका असं आवाहन रिचर्ड हॉर्टन यांनी केले

चीननेही वुहान शहरात १० आठवड्यापर्यंत सक्तीचं लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना व्हायरस रोखण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे भारतानेही लॉकडाऊन शक्य असेल तेवढं वाढवावं असं मत रिचर्ड हॉर्टन यांनी व्यक्त केले.

वुहानमध्ये आक्रमकपणे २३ जानेवारीपासून एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे व्हायरसचं संक्रमण कमी करण्यात यश आलं. आता त्याठिकाणी परिस्थिती सर्वसामान्य होत आहे. दाट लोकसंख्येत हा व्हायरस झपाट्याने फैलावतो. सोशल डिस्टेंसिंगचं पालन न केल्यास धोका अधिक जास्त आहे असं रिचर्ड हॉर्टन यांनी सांगितले.