Corona Vaccine : महाराष्ट्राला सावत्र आईसारखी वागणूक का?, लसीच्या पुरवठ्यावरुन संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 04:47 PM2021-04-08T16:47:23+5:302021-04-08T17:03:43+5:30

महाराष्ट्रात कोरोनावरील लशींचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र असतानाचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाद रंगला आहे. महाविकास आघाडीतील नेते केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनावरील लशींचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र असतानाचा राज्य सरकार आणि केंद्र सरकार असा वाद रंगला आहे.

आरोग्यमंत्री आणि सरकारमधील नेतेमंडळींनी केंद्र सरकारलाच यासंदर्भात जबाबदार धरले आहे. त्यानंतर, भाजपा नेत्यांकडून पलटवार करण्यात येत आहे.

राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत, असे राजेश टोपेंनी म्हटले. त्यास, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.

देशातील केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

त्यातही, गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान, विशेष म्हणजे राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, असेही फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले.

लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर! होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली.

लसीकरणावरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील नेते केंद्र सरकार आणि भाजपा नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत.

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रासोबत सावत्र आईसारखी वागणूक का? असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

"देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात आज केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आल्याचे टोपे यांनी म्हटले.

पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. याबाबत माझं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं झालं आहे.

तुमचा फोन ठेवताच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून याबाबत योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश देतो", असं त्यांनी सांगितल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.