कोरोना लसीकरणानंतर आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू?; कुटुंबीयांची लसीविरोधात तक्रार, केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 09:07 AM2021-01-23T09:07:15+5:302021-01-23T09:21:29+5:30

Corona Vaccine : सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत आहेत.

देशात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाग्रस्तांची संख्या एक कोटीच्या वर गेली आहे. तर आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे.

सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील पाहायला मिळत आहेत.

हरियाणातील गुरुग्राममध्ये कोरोनावरील लस घेतल्यानंतर एका आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. मात्र या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनावरील लस घेतल्याने झाला आहे की इतर कोणत्या कारणामुळे झाला हे स्पष्ट झालेलं नाही.

महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी कोरोना लसीबाबत तक्रार दाखल केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूची सध्या चौकशी सुरू आहे. पोस्टमार्टम अहवालातून काहीही स्पष्ट झालेल नाही अशी माहिती गुरुग्रामच्या सीएमओने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील गुरुग्राम जिल्ह्यातील भांगरौला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत 55 वर्षीय राजवंती यांना 16 जानेवारीला लस देण्यात आली होती. सीएमओ वीरेंदर यादव यांनी राजवंतीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या अकस्मात मृत्यूची शुक्रवारी माहिती दिली. मात्र मृत्यू कोरोनावरील लसीकरणामुळे झाल्याचा कोणताही पुरावा नाही असं म्हटलं आहे.

राजवंती यांचा मृत्यू कृष्णा नगर कॉलनी येथील त्यांच्या राहत्या झाला. राजवंती यांच्या मृत्यूची चौकशी केली जात आहे. चाचणीसाठी व्हिसेराचे नमुने पाठवण्यात आले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच नेमकं कारण स्पष्ट होईल, असं सीएमओने म्हटलं आहे.

महिले कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी कोरोनावरील लसीला मृत्यूसाठी जबाबदार धरलं आहे. कुटुंबीयांनी कोरोना लसीकरणविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून देण्यात आली आहे.

कोरोनावरील लसीकरण त्वरित थांबवावं असं देखील कुटुंबीयांचं म्हणणं आहे. लसीकरणानंतर काहींना त्याचे साईड इफेक्ट झाल्याचं समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतातील अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना लसींचा डोस विकत घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम चालवली जात असून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कोरोना योद्धांना पहिल्या फेरीत लस दिली जात आहे.

स्टील उत्पादक श्रेत्रातील जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड, महिंद्रा ग्रुप आणि आयटीसीसारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घेण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे.

सरकारकडून प्रथामिक स्तरावर कोरोना लसीची मागणी संपल्यानंतर ही लस बाजार उपलब्ध होईल. त्यावेळी या मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाची लस विकत घेतील असं सांगितलं जात आहे.

कॉर्पोरेट ह्यूमन रिसोर्सचे प्रमुख असणाऱ्या अभिताव मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार "आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करायचं आहे. यासाठी आम्ही लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला असून आमच्यात सध्या चर्चा सुरू आहे.

टाटा स्टीलने कोरोनाची लस व्यवसायिक पद्धतीने बाजारपेठेत उपलब्ध झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येईल असं म्हटलं आहे. आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांत कोरोना लसीकरण मोहिमेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.